नवी दिल्ली :- कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे माजी खासदार राहुल गांधी मंगळवारी पहाटे दिल्लीच्या आझादपूर भाजी मार्केटमध्ये पोहोचले. तेथे त्यांनी भाजीपाल्याचे भाव तर विचारलेच, शिवाय भाजी विक्रेते आणि तेथे काम करणाऱ्या कामगारांशीही चर्चा केली.
तत्पूर्वी राहुल गांधी एका मोटार मेकॅनिकपर्यंत पोहोचले होते. दोन दिवसांपूर्वी त्यांनी आई सोनिया गांधी यांच्या घरी हरियाणातील महिला शेतकरी नेत्यांसोबत भोजन केले होते.
शेतकरी, ट्रक चालक आणि ट्रॅक्टर चालकांच्या पाठीशी उभे राहून राहुल गांधींना आपला पक्ष देशातील सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी उभा असल्याचा संदेश द्यायचा आहे. पण कॉंग्रेसची ही रणनीती प्रभावी ठरेल का, असा प्रश्न दिल्लीच्या राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.
राहुल गांधींच्या या उपक्रमाचे सर्वात मोठे यश असे म्हणता येईल की ते दिवसाच्या सुरुवातीलाच एक अजेंडा ठरवतात. उर्वरीत दिवसात मीडिया आणि सोशल मीडियावर त्यांच्या या कामांची जोरदार चर्चा होते. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये विशेष उत्साह दाखवला जात असताना अशा प्रसंगी भाजी विक्रेत्यांना भेटण्याचे काम त्यांनी केले आहे.
मात्र अचानक आझादपूर भाजी मंडईत पोहोचून राहुल गांधींनी पंतप्रधानांच्या कार्यक्रमाऐवजी मीडियाचे लक्ष वेधून घेतले आहे. राजकारणात प्रचारयुद्धाला स्वतःचे विशेष महत्त्व असते. हे पाहता दिवसाची पहिली बाजी राहुल गांधींच्या नावावर होती, असे म्हणता येईल.