कोपरगाव, – अहमदनगर, नाशिक जिल्ह्यासह मराठवाड्यास भासणाऱ्या पाणीटंचाईच्या प्रश्नावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी उत्तर महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्राला वाहून वाया जाणारे अतिरिक्त पाणी पूर्वेकडे उर्ध्व गोदावरी खोऱ्यात वळविण्याच्या प्रकल्पास राज्य सरकारने गती द्यावी, अशी मागणी माजी आमदार तथा भाजप नेत्या स्नेहलताताई कोल्हे यांनी केली आहे.
कोल्हे यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, उर्ध्व गोदावरी खोरे हे पाण्याच्या उपलब्धतेबाबत अतितुटीचे खोरे म्हणून ओळखले जाते. या तुटीच्या खोऱ्यात पाणी उपलब्ध होऊन पाण्याची समृध्दी व्हावी आणि राज्यातील अहमदनगर, नाशिक जिल्ह्यासह मराठवाड्यातील पाण्याचा ज्वलंत प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागावा म्हणून माजी मंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांनी पश्चिमेचे अरबी समुद्राला वाहून जाणारे अतिरिक्त पाणी पूर्वेकडे तुटीच्या उर्ध्व गोदावरी खोऱ्यात वळवावे म्हणून सातत्याने पाठपुरावा केला आणि याबाबत सन 2000 मध्ये विधिमंडळात मंजुरी घेतली. तसेच माझ्या विधानसभा सदस्यत्वाच्या कार्यकाळात पाठपुरावा केला आहे.
कृष्णा खोरे प्रकल्पांतर्गत पाणी अडविण्यासाठी शासनाने प्रथम प्राधान्य देऊन कृती आराखडा तयार करून कामे मार्गी लावली होती. त्याच धर्तीवर पश्चिमेचे पाणी पूर्वेकडे उर्ध्व गोदावरी खोऱ्यामध्ये वळविण्याच्या कामास प्राधान्य देण्याची अत्यंत गरज आहे. यासाठी कृती आराखडा तयार करून धडक कार्यक्रम हाती घेऊन हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होण्याच्या दृष्टीने तातडीने अंमलबजावणी व्हावी व त्यासाठी भरघोस निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी कोल्हे यांनी केली.
उर्ध्व गोदावरी खोऱ्यातील अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील फळबागा, दीर्घकालीन शेती योजना,औद्योगिक प्रकल्प, तसेच पिण्याचे पाणी यांचे सुयोग्य नियोजन होऊ शकते. तसेच मराठवाडा विभागातील शेती सिंचन, औद्योगिक क्षेत्र व पिण्यासाठी लागणारे पाणी यांचेही सुयोग्य नियोजन होऊन शाश्वत पाणीपुरवठा होऊ शकतो.
कमी व बेभरवशाचे पर्जन्यमान, वाढते नागरीकरण व औद्योगिकरण व इतर कारणांमुळे उर्ध्व गोदावरी खोऱ्यात नेहमीच पाण्याची समस्या भेडसावत असून, पाण्याअभावी शेती व्यवसाय धोक्यात आला आहे. पश्चिम वाहिनी नद्यांद्वारे मोठ्या प्रमाणात अरबी समुद्राला पाणी वाहून जाते. हे पाणी पूर्वेकडे गोदावरी खोऱ्यात वळविल्यास अहमदनगर, नाशिक जिल्ह्यासह मराठवाडा विभागातील पाण्याचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होणार आहे. असे कोल्हे यांनी निवेदनात म्हटले आहे.