नवी दिल्ली – काँग्रेसचे दिग्गज नेते गुलाम नबी आझाद पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्याचे कारण म्हणजे त्यांनी राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले आहेत. गुलाम नबी आझाद यांनी एका कार्यक्रमात केलेल्या विधानानंतर ते कधीही राजकारणातून निवृत्ती घेऊ शकतात, असा अंदाज लावण्यात येतोय.
नुकतेच काँग्रेसच्या G-23 नेत्यांच्या बैठकीत आझाद खूप चर्चेत होते. बंडखोर काँग्रेस नेत्यांचे नेते म्हणूनही त्यांची निवड झाली होती.
जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला होता. त्यांना आज राष्ट्रपती भवनात हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराबद्दल गुलाम नबी आझाद यांना सन्मानित करण्यासाठी जम्मू-काश्मीर हायकोर्ट बार असोसिएशन आणि ज्येष्ठ वकील एमके भारद्वाज यांच्यातर्फे रविवारी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, समाजात परिवर्तन घडवून आणायचे आहे. मी निवृत्त होऊन समाजसेवेत गुंतलोय हे अचानक ऐकायला मिळणं ही काही मोठी गोष्ट नाही. त्यामुळे आझाद यांच्या निवृत्तीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
गुलाम नबी आझाद यांनी कार्यक्रमात ३५ मिनिटे भाषण केले. मात्र राजकारणावर बोलणार नसल्याचे त्यांनी आधीच सांगितले होते. ते म्हणाले की, ‘भारतातील राजकारण इतके बिघडले आहे की, आपण माणूस आहोत की नाही अशी शंका अनेकवेळा येते.