श्रीनगर – डेमोक्रेटीक प्रोग्रेसिव्ह आझाद पक्षाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री गुलाम नबी आझाद यांनी लोकसभेची निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्यांच्या पक्षाने अनंतनाग- राजौरी येथून त्यांची उमेदवारी जाहीर केली होती. त्यांच्याऐवजी आता त्यांच्या पक्षाचे नेते ॲड. मोहम्मद सलिम निवडणूक लढवणार आहेत.
२०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत कठुआ- उधमपूर मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे नेते आणि केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आझाद यांचा पराभव केला होता. आता याच जागेवरून पीपल्स डेमोक्रॅटीक पक्षाच्या म्हणजे पीडिपीच्या नेत्या आणि जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री रिंगणात आहेत.
दरम्यान, आझाद यांच्या निर्णयाबाबत माहिती देताना त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमिन भट्टा म्हणाले की आझाद यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाची दोन तास बैठक झाली. त्यात अनंतनगार राजौरी येथून मोहम्मद सलिम यांना रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामागे काही कारण आहे व त्याच्याशी सगळे सहमत असल्याने तो घेण्यात आल्याचेही भट्टा यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, गुलाम नबी आझाद पराभवाच्या भितीने निवडणूक लढवत नसल्याची बोचरी टीका नॅशनल कॉन्फरन्सचे नेते उमर अब्दुल्ला यांनी केली आहे. त्याला उत्तर देताना भट्टा म्हणाले की हा उमर यांचा भ्रम आहे. आझाद यांनी महाराष्ट्रातून दोन वेळा निवडणूक जिंकली आहे. काश्मीरमध्ये लढण्यासाठी ते कशाला घाबरतील.
कॉंग्रेस नेते इम्रान प्रतापगढी यांनीही नाव न घेता आझाद यांच्यावर टीका केली आहे. ज्यांनी दिल्लीतील आपला बंगला वाचवण्यासाठी तुमच्या स्वप्नांचा सौदा केला ते तुमच्याकडून येउन मते मागत आहेत अशा शब्दांत त्यांनी आझाद यांना लक्ष्य केले.