पणजी – भारतीय जनता पक्षाची देशातील दादागिरी आता बास झाली अशा शब्दात तृणमुल कॉंग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी आज गोव्यात भाजपवर हल्लाबोल केला. पण त्याचवेळी कॉंग्रेसलाही चार खडे बोल सुनावताना त्यांनी म्हटले आहे की, कॉंग्रेस पक्ष राजकारणाविषयी फारसा गंभीर दिसत नाही. त्यामुळे नरेंद्र मोदी आणखीनच शक्तीशाली बनण्याचा प्रयत्न करतील.
कॉंग्रेस पक्ष निर्णयच घेताना दिसत नाही असेही त्यांनी म्हटले आहे. ममता बॅनर्जी गोव्यातील पक्ष बांधणीसाठी तीन दिवसांच्या दौऱ्यावर आल्या होत्या. या दौऱ्याच्या समारोप प्रसंगी पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या की भाजप विरोधातील आघाडीबाबत कॉंग्रेस पक्ष कोणताच निर्णय घेत नसल्याने देशाचे नुकसान होते आहे. जर एखादा निर्णयच घेत नसेल तर देशाने त्यासाठी नुकसान का सहन करायचे असा सवालही त्यांनी केला.
गेल्यावेळी त्यांना भाजपच्या विरोधात सक्षमपणे लढण्याची संधी चालून आली होती पण कॉंग्रेसवाले पश्चिम बंगाल मध्ये माझ्या विरोधातच लढत राहिले. कॉंग्रेस पार्टीने अन्य प्रादेशिक पक्षांना बरोबर घेऊन त्यांनाही तिकीटे दिली पाहिजेत. पण त्यांनी राजकारण अजून गांभीर्याने घेतलेले दिसत नाही असे त्यांनी नमूद केले.
आमचा पक्ष गोव्यातील सर्व 40 जागा लढवणार आहे असेही ममतांनी यावेळी नमूद केले. त्या म्हणाल्या की देशातील फेडरल स्ट्रक्चर मजबूत ठेवायचे असेल तर देशातील प्रादेशिक पक्ष मजबूत झाले पाहिजेत आणि प्रादेशिक पक्ष मजबूत झाले तरच केंद्रातील भाजपच्या दादागिरीला पायबंद घालता येईल असे त्यांनी नमूद केले. काहीही झाले तरी आम्ही भाजपच्या दादागिरीपुढे आमची मान तुकावणार नाही असेही ममतांनी स्पष्ट केले.