Maharashtra Politics: माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा हात सोडत कमळ हाती घेतले. यानंतर काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता असल्याने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस विधिमंडळ सदस्यांची बुधवारी बैठक बोलावली होती. मात्र ती स्थगित करण्यात आल्यानंतर पुन्हा एकदा आज बैठक बोलवण्यात आली आहे. मात्र या बैठकीला काही आमदार अनुपस्थिती असल्याने चर्चांना उधाण आले आहे.
काँग्रेसच्या एकूण आमदारांपैकी 25 आमदार फक्त उपस्थित होते, तर इतर आमदार गैरहजर होते. अशोक चव्हाण यांच्याबरोबर काही आमदार देखील काँग्रेस सोडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे आज सर्व आमदारांना व्हीप देऊन काँग्रेस बैठक बोलावली आहे. त्यामुळे या बैठकीत सर्व काँग्रेस आमदार उपस्थित राहतात का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यामुळे धसका घेतलेल्या काँग्रेसने प्रदेश अध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांनी आमदारांना फोनद्वारे बैठकीला उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या होत्या.
मात्र या बैठकीला मोहन हंबर्डे, माधव जवळगावकर आणि जितेश अंतापुरकर हे गैरहजर होते. आमदार अनुपस्थिती बाबत पटोले यांनी काही आमदार आमच्या परवानगीने गैरहजर राहणार असल्याचे सांगितले. तसेच राज्यसभा निवडणूक जरी झाली तरी काँग्रेस पक्षाचा उमेदवार विजयी होईलच, असा विश्वासही नाना पटोले यांनी व्यक्त केला. या बैठकीनंतर चंद्रकांत हंडोरे यांचा राज्यसभेचा उमेदवार अर्ज भरला जाणार आहे.