शिर्डी(प्रतिनिधी) – सर्वांनाच आपल्या राजकीय भवितव्यासाठी भाजप हा उत्तम पर्याय वाटत असल्याने शिवसेनाच काय कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार सुुद्धा संपर्कात असल्याचा दावा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.
शिर्डी येथे माध्यमांशी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, विरोधी पक्षातील बहुतांश नेते आमच्याकडे येण्यास इच्छुक आहेत, परंतु याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. सेनेचे आता काय फक्त दहा ते बारा लोक शिल्लक राहिले आहे. प्रत्येकाला आपल्या भविष्याची चिंता आहे. अनेक राजकीय पक्षात भवितव्य अंधारात ढकलण्यासारखे झाल्याने लोक पर्याय शोधत असल्याने भाजप सगळ्यांच्या दृष्टीने अतिशय उतम पर्याय आहे.
कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते संपर्कात आहेत. उद्याच्या दोन पोटनिवडणुका झाल्यानंतर अनेक राजकीय घडामोडी घडणार असल्याचे सूतोवाच त्यांनी केले.
राज्यपालांच्या राजीनाम्यावरून विरोधकांनी सुरू केलेल्या कांगाव्याला कोणताही अर्थ नाही. त्यांनी व्यक्त केलेल्या इच्छेनुसारच राजीनामा मंजूर झाला असेल. खरंतर त्यांची ज्येष्ठता, श्रेष्ठता याचा विचार करून त्यांचा सन्मान राखण्याचे भान विरोधकांनी ठेवले पाहिजे, असे मत विखे पाटील यांनी व्यक्त केले.
दिल्या घरी सुखी रहा
कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आ.बाळासाहेब थोरात यांच्या नाराजीची पक्षश्रेष्ठींनी फार दखल घेतलेली नाही. कॉंग्रेसच्या समित्यांचे पुनर्गठन झाले, त्यामध्ये त्यांना कुठेही घेण्यात आले नाही. कुठं जायचं यासाठी त्यांना त्यांचा मार्ग मोकळा आहे पण दिल्या घरी सुखी राहा, असेच मी त्यांना सांगेल. आमच्या पक्षश्रेष्ठींना जर वाटले की ते पक्षाच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावू शकतात तर त्यांचे स्वागतच असल्याचे विखे यांनी सांगितले.