जयपूर – या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या राजस्थान विधानसभा निवडणुकीत 156 जागा जिंकण्याचे उद्दीष्ठ कॉंग्रेसने ठेवले असून त्यासाठी त्यांनी ‘मिशन 156’मोहीम सुरू केली आहे अशी माहिती राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी काल दिली.
प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना गेहलोत म्हणाले की, कॉंग्रेस पक्ष एकजुटीने निवडणुकीत उतरला तर आम्ही आमच्या मिशन 156 मध्ये यशस्वी होऊ. 1998 मध्ये कॉंग्रेसला 156 जागा मिळाल्या होत्या, आणि मी त्यावेळी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष होतो आणि आता पुन्हा त्याच मिशनने आम्ही धावत आहोत,असे ते म्हणाले.
यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या कारभारावरही टिका केली, ते म्हणाले की देशात श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी वाढत आहे. महागाई आणि बेरोजगारीही वाढत आहे. केंद्र आणि राज्य सरकारांनी याकडे लक्ष दिले पाहिजे.
भारत जोडो यात्रेचा संदर्भ देताना ते म्हणाले की, राहुल गांधींना इतका खडतर प्रवास का करावा लागला याचाही देशाने विचार केला पाहिजे. भाजपचा घोडेबाजार करून सरकारे पाडण्याचा डाव आम्ही राजस्थानात यशस्वी होऊ दिला नाही आमदारांनी एकजुटीने सरकारला साथ दिल्यामुळेच हे घडू शकले असे ते म्हणाले.