नवी दिल्ली – दिल्लीत दंगली झाल्यानंतर 69 तासांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीकर बंधु भगिनींना शांततेचे आवाहन केल्याबद्दल आदरणीय पंतप्रधान आपले मनापासून आभार, असा एक उपरोधिक संदेश ज्येष्ठ कॉंग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी ट्विटरवर दिला आहे.
दिल्लीत दंगली सुरू असतानाहीं पंतप्रधान केवळ अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्या स्वागत व सरबराईतच व्यस्त होते. तीन दिवसांनी त्यांनी दिल्लीतील दंगलींबद्दल आपले मोैन सोडून दिल्लीकरांना शांततेचे आवाहन केले. त्या अनुषंगाने सिब्बल यांनी त्यांचे उपरोधिक आभार मानले आहेत.
दिल्लीत 38 जणांचे बळी गेले आहेत. दोनशे जण जखमी झाले आहेत. हजारो मालमत्तांचे नुकसान झाले आहे. तरीही दिल्ली सरकारचे मंत्री कॉंग्रेसलाच दोष देत आहेत, मी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांबद्दलही प्रार्थना करतो असेही सिब्बल यांनी म्हटले आहे.
दिल्ली दंगल निष्क्रीयपणे हाताळल्याबद्दल कॉंग्रेसने गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही जोरदार टीका केली असून त्यांनी शहांना मंत्रीपदावरून काढून टाकण्याची मागणी या आधीच राष्ट्रपतींकडेही केली आहे. भारतीय जनता पक्षाने मात्र कॉंग्रेस व आम आदमी पक्षावर यावरून टीका करीत दंगलींबद्दल त्यांनाच दोषी ठरवले आहे.