श्रीकांत देवळे
विविध प्रकारची व्यसने करणारे लोक आपण पाहतो. पण त्यातील तंबाखू आणि तंबाखूजन्य उत्पादनांचे व्यसन करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम माहीत असूनही त्यांचे सेवन करणाऱ्यांची संख्या मोठी असणे हे दुर्दैवी असले तरी वास्तव आहे. त्यामुळे ही व्यसने रोखण्यासाठी केंद्र सरकार काही ठोस पावले कायद्याच्या रूपात उचलण्याच्या विचारात आहे.
रस्त्यावरून चालताना, गाडी चालवताना अगदी सहजपणे रस्त्यावर पचकन थुंकणाऱ्या व्यक्ती आजूबाजूला नजरेस पडतात. कित्येक जण तर तोंडात तंबाखू ठेवूनच वावरत असतात आणि रस्त्यावर पिंका टाकतात. भारतात तंबाखू खाणाऱ्यांची संख्याही खूप मोठी आहे आणि तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन असणाऱ्यांचीही संख्या मोठी आहे. या व्यसनाधिनतेमुळे दरवर्षी सुमारे 10 लाख लोकांचा अकाली मृत्यू होतो. हे चित्र निश्चितच निराशाजनक आहे. तंबाखूजन्य पदार्थांमुळे होणारे दुष्परिणाम आणि होणाऱ्या मृत्यूंची आकडेवारी पाहता आता केंद्राने यावर कायदेशीर लगाम लावण्याची तयारी केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या एका समितीने सिगारेट, विडी आणि तंबाखू उत्पादनांच्या सेवनासाठी कायदेशीर वय 18 पेक्षा वाढवून ते 21 वर्षे करण्याची शिफारस सरकारकडे केली आहे. या अहवालाचा अभ्यास सरकार गांभीर्याने करत आहे आणि ही शिफारस सरकार लवकरच लागूही करण्याची दाट शक्यता आहे.
या अहवालातील शिफारशीनुसार सिगारेट आणि इतर तंबाखूजन्य उत्पादनांसाठीच्या कायद्यामध्ये बदल करण्यात येईल. कायद्यामध्ये बदल केल्यानंतर देशातील 21 वर्षांपेक्षा कमी वयाच्या किशोरवयीन तरुणांना तंबाखूचे सेवन आणि खरेदी विक्री करता येणार नाही. त्याचबरोबर पालक किंवा घरातील मोठ्या व्यक्तींना 21 वर्षे वयापेक्षा कमी वयाच्या मुलांना तंबाखूजन्य उत्पादने विकत घेण्यासाठी बाजारात पाठवताही येणार नाही. तसे केल्यास हा कायदेशीर गुन्हा मानण्यात येईल. सरकारच्या मतानुसार, वय वर्षे 21 पर्यंत तंबाखू किंवा तंबाखूजन्य उत्पादने सेवन करण्यापासून रोखल्यास देशामध्ये तंबाखूच्या उत्पादनांचे सेवन करणाऱ्यांच्या संख्येत खूप घट होईल. या कायद्याचे उल्लंघन केल्यास होणाऱ्या दंडाच्या रकमेतही वाढ केली जाणार आहे. ग्लोबल ऍडल्ट टोबॅको सर्व्हे 2 नुसार देशातील 29 टक्के लोक कोणत्या ना कोणत्या तंबाखूजन्य उत्पादनांचे सेवन करतात.
तंबाखू ही निकोटियाना प्रजातीच्या झाडाची पाने सुकवून तयार केली जाते, अर्थातच तिची नशा करण्यासाठी ती बनवली जाते. तंबाखू म्हणजे गोड विष आहे, जे विडी, सिगारेट, हुक्का, जर्दा, किमाम, खैनी, गुटखा आदी उत्पादनांमध्ये वापरली जाते. ही उत्पादने धूरविरहीत आणि धूर निघणारी अशी असतात. तंबाखूचा वापर केल्याने तोंड, घसा, मेंदू, गलगंड किंवा थायरॉईड, फुफ्फुसे, पित्ताशय, मूत्रपिंड आणि स्तनसहित शरीरात विविध अवयवांमध्ये कर्करोग निर्माण करू शकतो. तंबाखूमुळे हृदयरोग, फुफ्फुसासंबंधी आजार, पक्षाघात, अंधत्व, दात, हिरड्यांचे आजार देखील होऊ शकतात. तंबाखू गुटख्याच्या स्वरूपात खाल्ल्यास पांढरे डाग, तोंड न उघडता येणे तसेच कर्करोग देखील होतो. सतत गुटखा किंवा तंबाखूचे सेवन केल्यास दात सैल होतात कमजोरही होतात. दातांमध्ये जीवाणूंची निर्मिती होते. त्यामुळे दातांचा रंग बदलतो शिवाय हळूहळू दातांची झीजही होते. तंबाखू किंवा गुटखा सातत्याने सेवन करणाऱ्यांची जीभ, जबडा आणि गालाच्या आतल्या बाजूला पांढरे चट्टे पडतात. त्यातून तोंडाच्या कर्करोगाची सुरुवात होते. हळूहळू व्यक्तीला तोंड उघडणे अशक्य होते, तोंडात कर्करोग पसरतो.
जगात भारत दुसऱ्या क्रमांकाचा तबांखूचा ग्राहक किंवा उपभोक्ता आहे आणि तिसरा मोठा उत्पादक देश आहे. तंबाखूच्या वापराची व्यापकता पुरुषांमध्ये 42 टक्के आणि महिलांमध्यं 14 टक्के आहे. आकडेवारीनुसार भारताच्या लोकसंख्येचा 30 टक्क्यांहून अधिक भाग ज्यांचे वय 15 वर्षांपेक्षा अधिक आहे, अशा गटाचा आहे ते कोणत्या ना कोणत्या स्वरूपात तंबाखूचे सेवन करतात. त्यामध्ये 14.6 टक्के मुले आहेत, ज्यांचे वय 13 ते 15 वर्षांदरम्यान असते.
तंबाखूच्या सेवनाने जीवनशक्तीचा ऱ्हास होतो हे सर्वांनाच माहीत आहे. व्यसन करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हे ज्ञात असते की तंबाखूचे सेवन हानीकारक आहे. परंतु अनेक प्रयत्न करूनही तंबाखूची सवय सुटत नाही. जेव्हा दुर्दैवाने व्यक्ती एखाद्या मोठ्या भयानक रोगाला बळी पडते तेव्हा ही सवय किती धोकादायक आहे याची जाणीव व्यक्तीला होते मात्र तोपर्यंत फार उशीर झालेला असतो. तंबाखूचा वापर कोणत्याही रूपात केला तरीही त्याचे शरीरावर दुष्परिणाम होतातच. तंबाखू सेवन शरीरासाठी हानीकारक आहेच शिवाय त्यामुळे व्यक्तीचा सामाजिक, आर्थिक स्तरही खालावतो. अनेकदा या व्यसनांपायी लोकांचे घर संसारही उद्ध्वस्त होतात.
तंबाखू सेवन, त्याचे दुष्परिणाम याविषयी देशात अनेक संशोधने करण्यात आली. त्यामधून असे स्पष्ट झाले की गालांमध्ये होणाऱ्या कर्करोगाचे मुख्य कारण आहे ते म्हणजे जिभेखाली ठेवली जाणारी, चावली जाणारी तंबाखू. तसेच जिभेचा, पाठीचा कर्करोग होण्याचे कारण विडी पिणे हे असू शकते. सिगारेटमुळे घशाच्या खालच्या भागात कर्करोग होऊ शकतो. शिवाय आतड्यांचा कर्करोग होण्याची शक्यताही असते. आपल्याला निरोगी, आनंदी आयुष्य जगायचे असेल तर तंबाखूचे सेवन करणे तातडीने थांबवण्याची गरज आहे. तंबाखूचे सेवन सोडणे हे काही विशेष कठीण काम नाही. तंबाखू सेवन करणे दृढनिश्चय करून जरूर बंद करता येऊ शकते.