माधव विद्वांस
भारताचे माजी पंतप्रधान व तत्कालीन मुंबईराज्याचे मुख्यमंत्री मोरारजीभाई देसाई यांचा आज जन्मदिन. त्यांचा जन्म 29 फेब्रुवारी 1896 रोजी गुजरातमधील बलसाड जिल्ह्यातील भादेली येथे झाला. 29 जानेवारी हा दिवस चार वर्षांत एकदा येणाऱ्या लीपवर्षात येत असल्याने त्यांचा जन्मदिन चार वर्षांतून एकदा येतो.त्यांचे प्राथमिक शिक्षण अमरेली जिल्ह्यातील सावरकुंडाला येथे झाले. त्यानंतर त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण मुंबईतील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात झाले होते, ते त्यावेळी गोकुळदास तेजपाल वसतिगृहात राहत असत.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी महात्मा गांधी, बाळ गंगाधर टिळक आणि इतर कॉंग्रेस नेत्यांची संभाषणे ऐकली होती. मोरारजी देसाई यांनी मुंबई प्रांतीय नागरी सेवेसाठी अर्ज करण्याचे ठरवले तेव्हा सरकारतर्फे थेट भरती होत असे. वर्ष 1917 मध्ये त्यांना त्यासाठी विद्यापीठाच्या प्रशिक्षण कोर्समध्ये प्रवेश मिळाला. त्यानंतर वर्ष 1918 मध्ये ते उपजिल्हाधिकारी झाले. वर्ष 1930 मध्ये त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि म. गांधीजींच्या नेतृत्वातील स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला.
वर्ष 1931 मध्ये ते गुजरात प्रदेशच्या कॉंग्रेस समितीचे सचिव झाले. त्यांनी अखिल भारतीय युवा कॉंग्रेसची शाखा स्थापन केली आणि सरदार पटेल यांच्या सूचनेनुसार अध्यक्ष झाले. 1932च्या चळवळीत त्यांना दोन वर्षे तुरुंगवास भोगावा लागला. त्यानंतर त्यांनी बॉम्बे स्टेटच्या कॉंग्रेस मंत्रिमंडळात प्रवेश केला.
कडक शिस्त हा त्यांचा स्थायी भाव होता.ते वेळेवर कार्यालयात येत असत. भेटीसाठी दिलेली वेळ पाळीत असत. एखाद्या गोष्टीत त्यांचा निर्णय झाला की ठाम असत. लालबहादूर शास्त्रींच्या पश्चात ते पंतप्रधान पदाचे दावेदार होते. परंतु नेता निवडीमध्ये इंदिरा गांधी सरस ठरल्या. इंदिराजींच्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडे अर्थ खात्याचा कार्यभार दिला होता. वर्ष 1969 मध्ये त्यांच्याकडून अर्थ खाते काढून घेतले त्यावेळी अपमानित वाटून लगेचच त्यांनी राजीनामा दिला व ते केंद्रीय राजकारणापासून बाजूला फेकले गेले. राजकारणात केव्हा काय घडेल याचा भरवसा नसतो.
मंत्रिपदावर असलेले मोरारजी राजीनाम्यानंतर रेल्वेस्टेशनवर एकटेच गाडीची प्रतीक्षा करताना दिसले होते. मात्र 8 वर्षांच्या कालावधीनंतर जनतापक्ष सत्तेवर आला व ते भारताचे पंतप्रधान बनले. दोनच वर्षांत ते सरकार पडले. त्यानंतर ते राजकारणापासून दूर गेले. 10 एप्रिल 1995 रोजी वयाच्या 99व्या वर्षी त्यांचे मुंबई येथे निधन झाले.