पोलिसांचा सौम्या लाठीचार्ज
वारजे : लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्याने आता आपल्याला आपल्या गावी जायला मिळणार या आशेने आज सकाळच्या सत्रात परराज्यातील मजूर वारजे उड्डाण पुलाखाली शेकडोच्या संख्येने जमल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. कोरोनाचे संकट टळलेले नसताना एकाच वेळी एका ठिकाणी एवढे लोक जमल्याने पोलिसांसमोरच डोकेदुखी वाढली होती. शेवटी वारजे पोलिसांनी या मजुरांना सौम्य लाठीमार करत पुलाखालची गर्दी कमी केली.
वारजे माळवाडी परिसरात मोठ्या संख्येने परराज्यातील मजूर राहण्यास आहेत. कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉक डाऊन करण्यात आल्यानंतर हे मजूर आपल्या गावी जाऊ शकले नव्हते. काल लॉक डाऊन शिथिल करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आल्यानंतर या मजुरांनी आपल्या गावी परराज्यात जाण्याची तयारी सुरू केली होती. सोमवारी शेकडो मजुर सकाळी वारजे पुलाखाली जमा झाले होते.
उड्डाण पुलाखालीच आपल्या राज्यांत कसे जावे, यासंबंधीचे पत्रक लावण्यात आल्याची माहिती त्यांना मिळाली होती. मजुरांनी सुरुवातीला पोलिसांना विचारणा करायला सुरुवात केली. सुरुवातीला कमी असणाऱ्या मजुरांची संख्या हळूहळू वाढतच गेली. गर्दी वाढू लागल्याने शेवटी पोलिसांना ती पांगवण्यासाठी सौम्य स्वरूपात लाठीचार्ज करावा लागला.
कोरोना भीतीने सर्वजण दहशतीखाली आहेत अशातच प्रत्येक जण आपल्या मूळ गावी जाण्याच्या प्रयत्नात आहेत काहीजण लॉकडाऊनच्या अगोदरच गावी पोहोचले पण काही मजूर अडकल्याने त्यांना आपल्या गावी जाता आले नाही. आज नियम शिथील झाल्याने गावी जाण्याची माहिती पुलाखाली मिळणारा अशी बातमी पसरल्याने साधारण पाचशे मजूर पुलाखाली जमले होते.
आज दुपार नंतर येथील बराटे चाळीत परप्रांतीय मजुरांची यादी तयार करण्याचे काम वारजे गावठाणात सुरू करण्यात आले आहे. अशी माहिती वारजे माळवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी दिली.