नागपूर : कृषिमालाची वाहतूक करण्यासोबतच शेती यंत्रसामग्री घेऊन जाण्यासाठी चांगल्या शेतरस्त्यांची आवश्यकता आहे. यासाठी मातोश्री पाणंद रस्त्यांच्या कामांना गती देऊन मंजूर पाणंद रस्ते पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी दिले.
वनामती येथील सभागृहात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत विविध कामे तसेच मातोश्री पाणंद रस्ता योजनेच्या अंमलबजावणीबाबत नागपूर विभागाची आढावा बैठक रोहयो मंत्री भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.
मंत्री भुमरे म्हणाले की, शेती व शेतीपूरक उद्योग-व्यवसायांचा विकास होण्यासाठी पाणंद रस्त्याची निर्मिती होणे आवश्यक आहे. शेतमाल बाजारात पोहचविण्यासाठी तसेच यंत्र सामग्री शेतापर्यंत जाण्यासाठी शेतीला चांगल्या शेतरस्त्यांची गरज आहे. मातोश्री पाणंद रस्ता योजनेचा लाभ शेतकऱ्यांना त्वरित मिळावा यासाठी पावसाळ्यापूर्वी म्हणजेच 15 जूनपर्यंत पाणंद रस्त्यांचे काम पूर्ण करावे. तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत मागेल त्याला काम उपलब्ध करुन द्यावे. ज्या गावात रोहयोच्या कामांवर मजुरांचा प्रतिसाद चांगला आहे, तेथे आवश्यकतेनुसार नवीन कामे हाती घ्यावीत. यामुळे स्थानिक मजुरांना रोजगार उपलब्ध होऊन त्यांना आर्थिक स्थैर लाभेल. आर्थिक दुर्बल तसेच अकुशल कामगारांच्या हाताला काम मिळावे, हा रोजगार हमी योजनेचा मूळ उद्देश असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
संपूर्ण राज्यात प्रत्येक पंचायत समितीत रोजगार सेवकाला कामकाजासाठी तसेच आसन व्यवस्था उपलब्ध व्हावी, यासाठी मातोश्री भवन स्थापन करण्यात येईल. राज्यात एक लाखांवर पाणंद रस्त्यांची मागणी आहे. रोजगार हमी योजनेंतर्गत या रस्त्यांची कामे करण्यावर भर द्या. याशिवाय शाळेची कुंपण भिंत, स्मशानभूमी अशा कामांसाठीही रोहयो मजुरांची मदत घ्या. पाणंद रस्त्यांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.