कराड – राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरण कामाअंतर्गत मलकापूर (कराड) हद्दीतील उड्डाणपूल पाडण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, या कामामुळे वाहतुकीतील बदल व नागरिकांची गैरसोय पाहता 5 जून पूर्वी उड्डाणपूल पाडण्याचे काम पूर्ण करावे, अशा सूचना माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी अधिकार्यां ना दिल्या.
सातारा-कागल राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरण कामाअंतर्गत संगम हॉटेल (कोल्हापूर नाका) कराड ते एन. पी. मोटर्स (मलकापूर) या दरम्यान सुरु असणाऱ्या सहा लेन उड्डाणपुलाच्या कामादरम्यान वाहतुक व्यवस्थेबाबत निर्माण होत असलेल्या अडचणीबाबत आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर येथील शासकीय विश्रामगृहात आढावा बैठक पार पडली. या बैठकीत आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना विविध सूचना केल्या.
आ. चव्हाण म्हणाले, नागरिकांना वाहतुकीसंदर्भात कोणत्याही अडचणी निर्माण होवू नयेत, याची पूर्ण जबाबदारी एनएचएआय व डीपी जैन कंपनीने घेतली पाहिजे. मागील पंधरा दिवसातील काही अपघातांची माहिती घेता तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. 15 जूनपासून शाळा, महाविद्यालये सुरु होत असून मलकापूर शहरातून मोठ्या प्रमाणात विद्यानगर व कराड येथे विद्यार्थी शिक्षणासाठी जात असतात. विद्यार्थ्यांना सहज रस्ता ओलांडता यावा, अशी व्यवस्था करा. मलकापूर नगरपालिकेकडून नागरिकांना केला जाणारा पाणीपुरवठा व सांडपाणी प्रक्रिया लाईनला कुठलाही धोका पोहोचणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. नवीन उड्डाणपुलाचे काम सुरु असताना मागणीप्रमाणे पर्यायी मार्ग ठेवावेत.
प्रदीप जैन म्हणाले, सध्या मलकापूर शहरात दोन ठिकाणी अंतर्गत वळणे कार्यारत ठेवली असून लवकरच तिसरे वळण तयार केले जाईल. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पाणीपुरवठा व सांडपाण्याच्या पाईपलाईनसाठी केसिंग पाईपचा वापर करून पाईपलाईन क्रॉसिंग केल्या जातील. मनोहर शिंदे म्हणाले, महामार्गावरील, तसेच ढेबेवाडी विभागात जाणाऱ्या वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. त्यानुसार शहरातून ढेबेवाडीकडे, कोल्हापूरकडे जाणार्यो वाहतुकीचे नियोजन करणे आवश्यक आहे.