नगर – नगर जिल्ह्यात सुरुवातीला पावसाने हुलकावणी दिल्यानंतर परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने रब्बीच्या 64 टक्के पेरण्या फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत पूर्ण झाल्या आहेत. यात ज्वारीची पेरणी 58 टक्के क्षेत्रावर झाली असून गव्हाच्या क्षेत्रात वाढ होवून हे क्षेत्र 215 टक्क्यापर्यंत वाढले आहे.
रब्बी ज्वारीचे 4 लाख 69 हजार 785 हेक्टर निश्चित करण्यात आले असून आतापर्यंत 2 लाख 72 हजार 132 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. तर गव्हाच्या क्षेत्रात दुपटीहून अधिक वाढ झालेली आहे. 49 हजार 785 हेक्टरचे उद्दीष्ठ असताना 1 लाख 6 हजार 883 हेक्टर एवढे म्हणजेच 215 टक्के पेरणी झाली आहे.
मका या पिकाची 63 टक्के म्हणजेच 27 हजार 245 पैकी 17 हजार 130 हेक्टरवर पेरणी झाली आहे. हरभऱ्याची 1 लाख 18 हजार 103 पैकी 96 हजार 231 म्हणजेच 81 टक्के क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. तृणधान्याची 72 टक्के ,तर कडधान्याची 82 टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.
रब्बीचे एकूण या हंगामातील उद्दिष्टीत क्षेत्र 6 लाख 67 हजार 261 इतके असून त्यापेैकी 4 लाख 93 हजार 706 हेक्टर क्षेत्रावर म्हणजे 74 टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. ऊस लागवड 1 लाख 21 हजार 180 पैकी 81 हजार 371 हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच 67 टक्के झाली आहे. कांद्याची लागवड जिल्ह्यात सध्या 1 लाख 40 हजार 187 हेक्टर क्षेत्रावर झाली आहे. चारा पिकांची 58 हजार 377 हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. भाजीपाल्याची 16 हजार 694 हेक्टरवर लागवड झाली आहे.
कर्जत, जामखेड, पारनेर, नगरमध्ये ज्वारीची जास्त पेरणी
रब्बी हंगामातील ज्वारी हे नगर जिल्ह्यातील मुख्य पीक असून कर्जत तालुक्यात 534.95 टक्के,पारनेर 457.13 टक्के,जामखेड 436.18 टक्के , नगर 403.93 टक्के श्रीगोंदा 326.41 टक्के हेक्टरवर पेरण्या झालेल्या आहेत. सर्वात कमी अकोले तालुक्यात 0.29 टक्के, श्रीरामपूरमध्ये 12.74 टक्के व कोपरगावमध्ये 15.21 टक्के ज्वारीची पेरणी झालेली आहे. नेवासामध्ये गव्हाची सर्वाधिक 136.75 टक्के हेक्टरवर पेरणी झालेली आहे.