मुंबई – केंद्र सरकारचे देशातील समस्यांऐवजी कंगणावर जास्त लक्ष असल्याचे दिसून येत आहे, असे म्हणत शिवसेनेने मोदी सरकारला जोरदार टोला लगावला. तसेच शिवसेनेचे नेते आणि आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभेच्या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहून अभिनेत्री कंगणा रणावतवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
कंगणाने मुंबई आणि महाराष्ट्राचा अपमान केला आहे. त्यामुळे तिच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करत कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. या तक्रारीनंतर अध्यक्षांनी गृहमंत्र्यांना 24 तासांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे.
प्रताप सरनाईक म्हणाले, कंगणा रणावत ही मुंबई आणि महाराष्ट्राची तुलना तालिबान आणि पाकव्याप्त काश्मीरशी करत असेल तर निश्चितपणे ते चुकीचं आहे. याबाबत मी विधानसभा अध्यक्षांना पत्रही दिले होते. सुशांत सिंह राजपूत प्रकरणात देखील अनेक ड्रग्जचे धागेदोरे समोर येत आहेत. कंगणाने अनेक फिल्म स्टारवर ड्रग्जचे आरोप केलेत आणि त्या फिल्स स्टारने देखील कंगणा ड्रग्जच्या आहारी गेल्याचे आरोप केले होते. त्यामुळे मी या सर्व प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी केली.
शिवसेनेने सुरुवातीपासून कंगणाविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी लावून धरली आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी याबाबत विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहून आपली सविस्तर भूमिका स्पष्ट केली. विधानसभा अध्यक्षांनी गृहमंत्र्यांना 24 तासात याबाबत भूमिका घ्यावी असे निर्देश दिले आहेत. तसेच पुढील 24 तासात या प्रकरणी अहवाल सादर करण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत.
मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवर म्हणाले, महाराष्ट्र पोलिसांवर विश्वास नसणारे महाराष्ट्र द्रोही आता देशभक्त. वारे वा कंगणा रणावत. आता त्यांना वाय काय झेड सुरक्षा द्यायला पाहिजे. मी पहिल्यांदाच म्हणालो होतो कंगणा रणावत या भाजपच्या पोपट आहेत. ते भाजपच्या मुखातील बोलत आहेत.
दुसरीकडे कंगणा चित्रपटसृष्टीला देखील धार्मिक रंग देत आहे. अशा गोष्टी सहन करायला नको. अशा व्यक्तींना महाराष्ट्रातून बाहेर हकलून दिले पाहिजे, असं मत आमदार अबु आझमी यांनी व्यक्त केले आहे.
मुख्यमंत्री ठाकरे यांचा अप्रत्यक्ष टोला
अनेकजण इतर प्रांतातून महाराष्ट्रात येतात रोजी रोटी कमावतात, नाव कमवतात काही जण महाराष्ट्राचं ऋण मानतात काहीजण मानत नाहीत, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कंगणा रणावतला अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.
ठाकरे म्हणाले, अनेकजण इतर प्रांतातून मुंबईत, महाराष्ट्रात येतात. रोजी रोटी कमावतात, नाव कमावतात. काही जण महाराष्ट्राचं ऋण मानतात काहीजण मानत नाहीत. अनिल राठोड राजस्थानहून येथे आले होते. मुंबई, मंचर, त्यानंतर नगरला गेले. सर्वसामान्यांसाठी त्यांनी त्यांचं काम सुरु केले. शिवसेना प्रमुखांच्या हिंदुत्त्वाच्या विचाराने त्यांनी खूपच चांगले काम केले.