भेंडा – मागील वर्षी सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नेवासा तालुक्यात शेतकऱ्यांचा खरीप व रब्बी हंगाम वाया गेला. राज्य सरकारने अशा बाधित शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे केले. त्यानुसार तालुक्यात आठपैकी तीन महसूल मंडलात भरपाई जाहीर झाली. मात्र, पाच महसूल मंडलातील शेतकरी यापासून वंचित राहिले. अशा वंचित शेतकऱ्यांना भरपाई मिळावी, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी भेट घेऊन निवेदन दिले आहे.
नेवासा तालुक्यातील सर्व महसूल मंडलात मागील वर्षी सप्टेंबर, ऑक्टोबर 2022 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यात आठ महसूल मंडलात सारखाच पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे 100 टक्के पिकांचे नुकसान झाले. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे महसूल व कृषी विभागाकडून रितसर पंचनामे होऊन तालुक्यात 70 हजार शेतकऱ्यांचे 51 हजार 165 हेक्टर शेतीवरील पिकांचे नुकसान झाले.
त्यामुळे अशा बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे काम आठपैकी तीन महसूल मंडलात जाहीर झाले पंरतु, उर्वरित पाच महसूल मंडलात देखील 100 टक्के पिकांचे नुकसान झाले आहे. या पाच महसूल मंडलास 100 टक्के नुकसान भरपाई मिळावी, यासाठी माजी आमदार मुरकुटे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई येथे भेट घेऊन भरपाई मिळावी, अशी मागणी केली.