नवी दिल्ली : देशातील वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य लोक चिंतेत आहेत. मात्र असे असतानाच आता मोदी सरकार सर्वसामान्य नागरिकांना वाढत्या महागाईपासून दिलासा देण्याची शक्यता आहे. मोदी सरकार पेट्रोल, डिझेलचे दर कमी करण्याची शक्यता आहे. याशिवाय खाद्यतेल आणि भाज्यांच्या दरात कपात होण्याची शक्यता आहे. यासाठी विविध मंत्रालयांच्या बजेटमधून एक लाख कोटींची तरतूद करण्यात येणार आहे. याबाबतचे कामही सुरू झाले असून हा पैसा खाद्य पदार्थ आणि इंधनाच्या वाढत्या किंमती रोखण्यासाठी लावला जाणार आहे. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने मोदी सरकारकडून महागाई कमी करण्यासंदर्भात ही तयारी सुरू असल्याचे म्हंटले जात आहे.
गेल्या महिन्यात महगाई पाच टक्क्यावरून साडेसात टक्क्यांपर्यंत वाढली होती. काही दिवसांपूर्वीच कांदे आणि टोमॅटोचे दरही वाढले होते. ज्याचा सर्वसामान्य नागरिकांना चांगलाच फटका बसला होता. मागील वर्षी अबकारी करात आणि पेट्रोल डिझेलसंदर्भात सरकारने सवलत दिली होती. आता दुसऱ्यांदा मोदी सरकारचा अशा प्रकारची सवलत देण्याचा विचार आहे. त्यासाठी एक लाख कोटींची तरतूद करण्यात येणार आहे. वित्तीय तूटीचे भार अधिक वाढू नये यासाठी काही मंत्रालयांचे बजेट देखील कमी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकार काय निर्णय घेणार हे पाहावे लागणार आहे.
नुकत्याच झालेल्या 15 ऑगस्टच्या भाषणातही पंतप्रधान मोदींनी महागाईवर भाष्य केले होते. जुलै महिन्यात किरकोळ महागाई 15 महिन्यांतील उच्चांकावर पोहोचली होती. यानंतर सरकारच्या हालचाली वाढल्या आहेत. भारत हा असा देश आहे, जिथे कांदे आणि टोमॅटोच्या किंमतींचा निवडणुकीवर मोठा परिणाम होत असतो, पुढच्या लोकसभा निवडणुकीला काही काळच उरला आहे. अशा परिस्थितीत, पंतप्रधान किंमतीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतील, असे म्हंटले जात आहे.