पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांची बदली होताच त्यांच्या जवळच्या अधिकाऱ्यांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे. आपल्याकडील “खास’ विभाग नवीन आयुक्त कायम ठेवतील की नाही? अशी धास्ती वाटत आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे तत्कालीन आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांची राज्य सरकारने दि. 16 ऑगस्ट रोजी तडकाफडकी बदली केली. पाटील यांनी आयुक्त म्हणून अवघा दीड वर्षांचा कार्यकाळ मिळाला. त्यांच्या जागी साताऱ्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची राज्य सरकारने नियुक्ती केली आहे. सिंह यांनी गुरूवार (दि.18) रोजी आयुक्त आणि प्रशासक पदाचा पदभार स्वीकारला. पाटील यांची महापालिकेत आणखी काम करण्याची इच्छा होती, असे स्वतः त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. पाटील आणि त्यांच्या सहकारी अधिकाऱ्यांनी राजकीय पुढाऱ्यांच्या मार्फत बदलीला स्थगिती मिळविण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केल्याची महापालिका वतुर्ळात जोरदार चर्चाही रंगली होती.
राजेश पाटील यांची उपायुक्त, सहाय्यक आयुक्तांशी गट्टी जमल्यानंतर आपल्या काही मर्जीतील अधिकाऱ्यांना महत्वाचे विभाग दिले होते. यामध्ये शासनाच्या अधिकाऱ्यांवर विशेष मेहेरबानी दाखवत मलईदार विभागाचा कारभार सोपविला होता. तर स्थानिक अधिकाऱ्यांना कमी महत्वाचे विभाग सोपविले होते. त्यामुळे स्थानिक अधिकाऱ्यांमध्ये पाटील यांच्याबाबत नाराजी पसरली होती. दुसरीकडे शासनाच्या अधिकाऱ्यांचा दिवसेंदिवस महापालिकेतील रूबाब वाढला होता.
स्थानिक अधिकाऱ्यांमध्ये काही बोटावर मोजण्याइतके अधिकारी पाटील यांनी जवळ केले होते. आता पाटील यांची राज्य सरकारने तडकाफडकी बदली केल्यानंतर त्यांच्या जवळच्या अधिकाऱ्यांमध्ये कमालाची अस्वस्थता पसरली आहे. तसेच काही अधिकारी स्वतःहून बदली करून घेण्यासाठी प्रयत्न करत असल्याची खात्रीलायक माहिती आहे. त्यामुळे येत्या काळात महापालिकेतील शासनाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या होण्याची शक्यता आहेत. तर पालिकेतील विविध विभागाच्या प्रमुखांच्या नवनियुक्त आयुक्त सिंह हे बदल्या करतात की त्यांनाच कायम ठेवतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
शेखर सिंह यांच्याकडून विभागानुसार आढावा सुरू
नवनियुक्त आयुक्त शेखर सिंह यांनी महापालिकेचा पदभार स्विकारताच शहराची माहिती घेण्यास सुरूवात केली आहे. तसेच महापालिकेच्या प्रत्येक विभागप्रमुखांकडूनही संबंधित विभागाची इत्यंभूत माहिती, आढावा घेण्यास सुरूवात केली आहे. शुक्रवारी त्यांनी काही महत्वाच्या विभागाच्या अधिकाऱ्यांशी वन-टू-वन चर्चा केल्याचेही समजते.