मुंबई : आपल्या मजेदार स्टाईलने सर्वांना हसवणाऱ्या भारती सिंहने नुकताच असा अनुभव सांगितला की, तो ऐकून तिचे चाहतेही स्तब्ध होतील. मनीष पॉलच्या नवीन शोमध्ये बोलताना भारतीने आपल्या गत आयुष्यातील घटनांना उजाळा दिला. भारतीने तिच्या वैयक्तिक ते व्यावसायिक जीवनापर्यंतचे अनेक किस्से सांगितले.
आपल्या करियरच्या सुरुवातीच्या काळात कार्यक्रम समन्वयक तिच्याशी कसे गैरवर्तन करायचे, हे भारतीने सांगितले. ती म्हणाली, “जे कार्यक्रमाचे संयोजक असायचे, ते बऱ्याच वेळा चुकीचे वागत असत. माझ्या पाठीवर हात फिरवायचे. मला ते अजिबात आवडत नव्हतं, पण नंतर असं वाटायचं की ते माझ्या काकांच्या वयाचे आहेत, मग ते असं का वागतील?’
भारतीने म्हणते की, आता मला समजले आहे की ते सर्व चूक होतं. त्यावेळी मला या सर्व गोष्टी समजल्या नव्हत्या. या व्यतिरिक्त आता माझ्यात जो आत्मविश्वास आहे तो यापूर्वी कधीही नव्हता. आता मी बेधडकपणे म्हणू शकते की, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, तुम्ही काय पहाताय, बाहेर जा, वैगरे पण त्यावेळी माझ्यात ही हिंमत नव्हती.
भारतीने तिचे बालपण आणि तिच्या आईने कठीण काळात कशा प्रकारे समाजाचा सामना केला याबद्दलही सांगितले. भारती म्हणाली, मी लहान असताना एकदा काही लोक एकदम घरात शिरले आणि त्यांनी कर्ज परताव्याचे पैसे कसे मागितले. त्यांनी अगदी माझ्या आईचा हात धरला होता. ते लोक तिच्याशी वाईट वागतायत, हे मला त्यावेळी माहित नव्हते. एकदा कुणीतरी तिच्या खांद्यावर हात ठेवण्याचे धाडस केले होते. त्यावेळी मग आई खूप चिडून बोलली होती. त्यावेळी माझी आई केवळ 24 वर्षांची होती.
भारतीने सांगितले की, बालपणात तिला आणि तिच्या कुटुंबियांना बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागला. वडिलांच्या मृत्यूनंतर तिची आई व बहिण एका कारखान्यात काम करत आणि एका दुकानात भाऊ काम करायचा. याशिवाय त्याची आई इतरांच्या घरी जेवण बनवायची. बऱ्याच वेळा असे घडायचे की, स्वतःच्याच घरात भाजीपालासुद्धा नसायचा. भारती म्हणाली, आम्ही कोरी चहा, रोटी आणि मीठ खाऊन झोपायचो.