नवी दिल्ली – अखेर उत्तर प्रदेश सरकारने बहुचर्चित कावड यात्रा रद्द करण्याचा निर्णय शनिवारी घेतल्याचे वृत्त ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने दिले.
करोना साथीच्या तिसऱ्या लाटेचा इशारा तज्ज्ञांनी दिला असतानाही उत्तर प्रदेश सरकारने कावड यात्रेला परवानगी देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या दट्ट्यानंतर उत्तर प्रदेश सरकारने कावड यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, करोना प्रसाराचा धोका कायम असतानाही उत्तरप्रदेश सरकारने 25 जुलैपासून सुरू होणाऱ्या कावड यात्रेला अनुमती देण्याचा जो निर्णय घेतला होता. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नापसंती व्यक्त करीत या निर्णयाचा फेरविचार करण्याचा आदेश राज्य सरकारला दिला होता. येत्या सोमवारपर्यंत त्या संबंधातील आपला निर्णय आम्हाला कळवा अशी सूचनाही सुप्रिम कोर्टाने योगी सरकारला दिली आहे. याबाबत शनिवारी योगी सरकारला ती रद्द करण्याचा निर्णय घेतला.
तत्पूर्वी, मागच्यावर्षी करोनाच्या पहिल्या लाटेमुळे कावड यात्रा रद्द करण्यात आली होती. यंदा उत्तराखंड राज्यानेही कावड यात्रेला अनुमती नाकारली आहे. ही यात्रा सुमारे पंधरा दिवस चालते. त्यात सुमारे तीन कोटी भाविक सहभागी होत असतात. हे भाविक युवक कावड घेऊन हरिद्वारला जातात आणि तेथील गंगानदीचे पाणी कावडीत भरून त्याचा आपल्या गावातील महादेवाच्या मंदिराला अभिषेक घालतात. उत्तरप्रदेशाखेरीज पंजाब, हरियाणा, हिमाचलप्रदेश, दिल्ली आदि ठिकाणाहूनही कावड यात्रा काढली जाते.