शेवगाव येथील भाजप, मित्रपक्षांतील नाराजांचा मेळावा वक्त्यांचा सूर
शेवगाव – आमदार झाल्यावर मोनिका राजळे यांनी भाजप वाढविण्यासाठी ज्यांनी खस्ता खाल्ल्या अशा कार्यकर्त्यांना खड्यासारखे वेचून बाहेर काढले. स्वत:च्या बगलबच्च्यांना महत्त्वाची व लाभाची पदे दिली, असा सूर भाजप व मित्रपत्रातील नाराजांनी शेवगाव येथे घेतलेल्या मेळाव्यात आळवला.
शेवगाव येथे आज आमदार राजळे यांच्यावर नाराज असलेल्या भाजप व मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा झाला.
अध्यक्षस्थानी जि. प. कृषी समितीचे माजी सभापती दिलीपराव लांडे पाटील होते. शिवाजीराव काकडे यावेळी उपस्थित होते. आम्ही पक्षाचे काम प्रामाणिकपणे करून त्यांना निवडून आणले. मात्र निवडून आल्यानंतर आमदार राजळे यांनी निष्ठावान कार्यकर्त्यांना ताकद देण्याऐवजी वेदना व त्रास देण्याचे काम केले. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे कार्यकर्ते व जनतेला बदल हवाय. पक्ष श्रेष्ठींनी आता जनता जनार्दनाचा कौल घेऊन त्यांच्या उमेदवारी बाबत योग्य तो निर्णय घ्यायची वेळ आली आहे.
मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांसाठी शासनाने पिण्याचे पाणी, सिंचन, उद्योग यासाठी साडेचार हजार कोटी रुपये दिले. मात्र आमदार राजळे यांनी येथील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी काही ठोस पदरी पाडून घेतले नाही. पक्षाने पुन्हा राजळे यांना उमेदवारी दिल्यास आम्ही त्यांचा प्रचार करणार नाही, असे यावेळी अनेकांनी सांगितले.
यावेळी माजी जि. प. सदस्या हर्षदा काकडे, जि. प. सदस्य मोहन पालवे, बाळासाहेब सोनवणे, भाजयुमोचे पाथर्डी तालुकाध्यक्ष अमोल गर्जे, माजी सभापती संभाजी पालवे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख अविनाश मगरे, आरपीआयचे पवनकुमार साळवे, बाबासाहेब ढाकणे, दिनकर पालवे, अविनाश देशमुख यांची भाषणे झाली. येळीचे सरपंच संजय बडे यांनी प्रास्तविक केले. भाऊसाहेब सातपुते यांनी सूत्रसंचालन, तर राहुल कारखिले यांनी आभार मानले. मेळाव्यास ज्येष्ठ नेते अशोक गर्जे, सुभाष भागवत, जगन्नाथ गावडे, मनोहर झिरपे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
अनुपस्थितांची चर्चा
या मेळाव्यास पत्रिकेत नाव असूनही जि. प.चे माजी सदस्य नितीन काकडे, अर्जुन शिरसाठ व माजी आमदार दगडू पाटील बडे यांचे चिरंजीव धनंजय बडे हे अनुपस्थित होते.