Manoj Tiwary on ‘umpiring’ of domestic cricket : बंगालकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळणारा मनोज तिवारी नुकताच निवृत्त झाला आहे. निवृत्तीनंतर मनोज सतत आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत येत आहे. यापूर्वी बंगालच्या माजी क्रिकेटपटूने रणजी करंडक स्पर्धा बंद करण्याची मागणी केली होती आणि आता त्याने देशांतर्गत क्रिकेटच्या ‘अम्पायरिंग’वर मोठा खुलासा केला आहे. मनोजने सांगितले की, अनेकदा अंपायर दारूच्या नशेतच मैदानात येतात.
मनोज तिवारी म्हणाला की, “खेळाडूंसोबतच पंचांचीही(अंपायर) ‘डोप टेस्ट’ झाली पाहिजे. मी अनेकदा पाहिले आहे की अंपायर (पंच) दारूच्या नशेतच मैदानात येतात आणि ते झोपलेले दिसतात. अशा परिस्थितीत ते नीट काम कसे करू शकतील? तो पुढे म्हणाला की, प्रत्येक हंगाम सुरू होण्यापूर्वी बीसीसीआयने पंचांचे कान आणि डोळे तपासले पाहिजेत.
मनोज तिवारी पुढे म्हणाला की, “अंपायरिंग हा माझ्यासाठी मुख्य चिंतेचा विषय आहे. देशांतर्गत क्रिकेटमधील अंपायरिंगचा दर्जा खालावत चालला आहे. बीसीसीआयने त्यात सुधारणा कशी करता येईल याचा विचार करायला हवा. ही एक-दोन वर्षांची गोष्ट नाही तर अनेक वर्षांपासून मी पाहतोय की, अंपायरकडून अनेक मोठ्या चुका होत आहेत.”
रणजी करंडक रद्द करण्याची केली होती मागणी…
मनोज तिवारी यांने अलीकडेच सोशल मीडियाच्या माध्यमातून रणजी ट्रॉफी रद्द करण्याची मागणीही केली होती. तो म्हणाला होता, “पुढील मोसमापासून रणजी करंडक कॅलेंडरमधून काढून टाकण्यात यावे. स्पर्धेत बरेच काही चुकीचे होत आहे. त्यामुळे स्पर्धेचे महत्त्व कमी होत आहे. ही ऐतिहासिक स्पर्धा वाचवण्यासाठी अनेक गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज आहे. “