पिंपरी – राज्यात सर्वत्र कोरडे वातावरण तयार झाल्याने सोमवारपासून (दि. 11) शहरात थंडीचा कडाका वाढणार आहे. बंगालच्या उपसागरात आलेल्या मिचाँग चक्रीवादळाने आठ दिवस वातावरण पावसाळी झाले होते. बहुतांश भागात दिवसभर गारे वारे सुटले होते. मात्र, शनिवारपासून हे वातावरण बदलण्यास सुरुवात झाली असून कडक ऊन पडल्याने दिवसभर उकाडा जाणवत होता. तसेच वातावरण निरभ्र झाल्याने किमान तापमानात घट होण्यास सोमवारपासून (दि. 11) सुरुवात होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
यंदाच्या वर्षी हवमानातील अनेक बदल शहरवासियांनी अनुभवले. आॅक्टोबर हिटचा तडाखा बसल्यानंतर नागरिकांनी नोव्हेंबर महिन्यातही एन दिवाळीत पावसाचा अनुभव घेतला. तसेच डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात गारवा अनुभवता आला नाही. त्यामुळे यंदाचा हिवाळा हा उष्णतेत गेला. मात्र, हिमालयात 11 डिसेंबरपासून नवी पश्चिमी चक्रवातच सक्रिय होत आहे.
सध्या आकाश निरभ्र असल्याने ते वारे वेगाने येऊन किमान तापमानात 2 ते 3 अंशांनी घट होणार असल्याने या शीतलहरींचा परिणाम होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असून त्यामुळे डिसेंबरच्या दुसऱया आठवड्यात तरी थंडीचा अनुभव नागरिकांना मिळेल, अशी आशा आहे. आगामी आठवडा हा थंडीचा राहणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.