कोपरगाव – हल्लीच्या ताणतणावाच्या जीवनात मैदानी खेळ चांगले असून, मुलांनी त्यात जास्तीत-जास्त सहभाग घेऊन स्वत:बरोबर देशाचे उज्वल भवितव्य घडवावे, असे आवाहन संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी केले.
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना, संजीवनी युवा प्रतिष्ठान व उद्योग समूहाच्यावतीने तालुक्यातील संवत्सर येथील अक्षय सुनिल रत्नपारखी याची २५ ते २७ डिसेंबर दरम्यान आग्रा येथे भारत विरूध्द नेपाळ दरम्यान होणाऱ्या सामन्यासाठी दिव्यांग आंतरराष्ट्रीय क्रिकेट टी-२० संघात भारताकडून निवड झाली आहे. याबद्दल त्याचा संचालक मंडळाच्या बैठकीत सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.
प्रारंभी संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी अक्षय रत्नपारखीच्या क्रिकेट खेळाचे कौतुक करत उज्वल भवितव्यास सदिच्छा दिल्या. उपाध्यक्ष मनेष गाडे यांनी स्वागत केले. संचालक ज्ञानेश्वर परजणे यांनी प्रास्तविकांत अक्षय रत्नपारखी याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत दिव्यांग क्रिकेट खेळात जे नैपुण्य दाखविले, त्यामुळे त्याची ही निवड झाल्याचे सांगितले.
सत्कारास उत्तर देताना अक्षय रत्नपारखी म्हणाले की, जनता इंग्लिश स्कूल संवत्सर व आत्मा मालिकच्या मैदानावर नागपुरचे प्रशिक्षक उत्तम मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेट खेळात सातत्य ठेवले. पंजाब, मोहाली, राजस्थान, छत्तीसगढ़ आदि ठिकाणी विविध स्पर्धेत संवत्सर गावचे नाव उज्वल करता आले. लवकरच दुबई येथील स्पर्धेतही भारत देशाचे नाव दिव्यांग क्रिकेट स्पर्धेत उज्वल करू, अशी ग्वाही दिली.