चरेगाव -उत्तरेकडून येणाऱ्या थंडगार वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात थंडीची लाट निर्माण झाली आहे. महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये सुद्धा पारा शुन्य अंश सेल्सिअसपर्यंत घसरल्यामुळे येथे येणारे पर्यटक गुलाबी मात्र रात्री बोचर्या थंडीचा अनुभव घेत आहेत. या थंडीमुळे आजार वाढल्याने दवाखान्यांमध्ये गर्दी होत आहे. त्यामुळे ठंडा ठंडा कुल कुल, दवाखाने हाउसफुल.. असल्याचे चित्र तालुक्यात आढळून येत आहे.
वाढत्या थंडीच्या कहराने अबाल वृद्धांचे मात्र हाल होत आहेत. कडाक्याच्या थंडीमुळे वृद्ध लोकांचे हातपाय आखडणे, बधिरता, अंगात कापरे भरण्यासारखे प्रकार होत आहेत. त्याचप्रमाणे सर्दी, खोकला, डोके, कान, घसा दुखी आदी विकार लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांमध्ये सर्रासपणे आढळून येत आहेत.
साधारणपणे रात्री वाटणारी थंडीची तीव्रता दिवसभरही जाणवत असून नागरिक दिवसभर घराबाहेरील अंगणामध्ये ऊनात बसत असल्याचे चित्र ग्रामीण भागात आहे. निसर्गाच्या सानिध्यात अगदी डोंगर कपारीवर वसलेल्या छोट्या-मोठ्या वाड्या-वस्त्यांभोवतालची नैसर्गिक जंगले तसेच शहरी भागातील सिमेंटची जंगले ह्या थंडीच्या कहरामुळे जणू काही शितग्रहेच बनली आहेत. त्यामुळे गवतीचहा, आले, तुळस यांपासून बनवलेल्या नैसर्गिक चहाचा आहारात समावेश करणे. तसेच स्वेटर, कानटोपी यांसारख्या उबदार कपड्यांचा वापर करून हिवाळ्यामध्ये आपले आरोग्य सांभाळणे गरजेचे आहे.