Aditya Thackeray : ठाकरे गटाने नेते आदित्य ठाकरे यांनी कोस्टल रोड प्रकल्पाच्या उद्घाटनावरून सरकारवर निशाणा साधला आहे. येत्या 19 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते कोस्टल रोड प्रकल्पाचे उद्घाटन होणार आहे. मात्र कोस्टल रोड पूर्ण झालेला नसतानाही केवळ निवडणुका तोंडावर आल्याने हे उद्घाटन केले जात असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हंटले आहे. नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी हा आरोप राज्य सरकारवर केला आहे.
“कोस्टल रोड प्रकल्प उद्धव ठाकरेंचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. या प्रकल्पासाठी आम्ही अनेक भेटी दिल्या आणि बोगद्याची सुद्धा पाहणी केली. मात्र, ज्यांचा मुंबईशी काहीही सबंध नाही ते उद्घाटन करणार आहेत,” अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी मुंबई रेसकॉर्सवर होणाऱ्या सेंट्रल पार्कबाबत देखील मोठा दावा केला आहे. “सामान्य नागरिकांसाठी खुली असणारी एकमेव 226 एकरची जागा मुंबई रेसकोर्सची आहे. अनेक लोक येथे व्यायमासाठी येतात. तसेच अनेक कार्यक्रम येथे होतात. मात्र या जागेवर सुरुवातीला क्लब होणार होते. पण आता येथे सेंट्रलल पार्क होणार असल्याचे समोर आले आहे.”
“मुंबई रेसकॉर्सच्या इथेच भूमिगत कार पार्किंग करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. मात्र आमचा या कार पार्कला विरोध आहे. कारण बाजूलाच कोस्टल रोड आहे. तिथे दोन हजार भूमिगत कार पार्किंगची व्यवस्था असतानाच बाजूलाच ही नवीन कार पार्किंग कशाला? कोणत्या कंत्राटदार मित्रासाठी तुम्ही हे कार पार्क करत आहे?,” असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, “मुंबईकरांच्या खिशातले शंभर कोटी रुपये पैसे घोड्याच्या तबेलासाठी वापरले जाणार आहेत. हे घोडे प्रायव्हेट गॅम्बलिंग आणि रेसिंग करणाऱ्या लोकांचे आहेत. सुटबुटातल्या लोकांसाठी मुंबईकरांचे पैसे वापरण्यात येणार आहे. त्यांना बाजूलाच SRAमध्ये समावून घेऊ, असं आश्वासन त्यांनी दिलं आहे. पण कोणत्या SRA मध्ये सामील करणार आहेत, याचे उत्तर त्यांनी द्यावे.” आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना सीएस बनायचं आहे किंवा दिल्लीत जायचं आहे. त्यामुळे ते खोटी माहिती देत आहेत असल्याचे आदित्य म्हणाले.
यावेळी आदित्य ठाकरे यांनी मुख्मंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील टीका केली. महाराष्ट्रात गँगवॉर सुरु आहे त्याचे लीडर मुख्यमंत्री आहेत, असे आदित्य ठाकरे म्हणाले.