मुंबई – पक्षबांधणीसाठी राज्यभर दौऱ्यावर असलेल्या माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राजीनामा देऊन त्यांच्याविरोधात वरळीमधून निवडणूक लढण्याचे चॅलेंज दिले होते. मुख्यमंत्री शिंदेंनी आता ठाकरेंच्या या आव्हानाला प्रत्युत्तर दिले आहे. ‘मी अशी छोटी नाही तर फक्त मोठी आव्हान स्वीकारतो असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठणकावून सांगितले आहे. विशेष म्हणजे वरळी येथे जाहीर सभा घेत शिंदेंनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आदित्य ठाकरेंच्या आव्हानाला उतत दिले.
‘गुवाहाटीला असताना काही लोक म्हणत होते वरळीतून येऊन दाखवा. मी एकटा आलो आणि हेलीकॉप्टरने न जाता रोडने येथून गेलो कारण आम्ही संघर्ष करून इथपर्यंत आलो आहोत असं देखील एकनाथ शिंदे यांनी यावेळी ठणकावून सांगितले. शाखाप्रमुखापासून मी काम केलेलं आहे. बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन आम्ही सेनेत आलो आणि आनंद दिघेंच्या तालमीत तयार झालेलो आम्ही कार्यकर्ते आहोत, तुम्ही कोणाला आव्हान देता ही आव्हान पेलतचं इथपर्यंत आलो आहोत असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
“मी अशी छोटी नव्हे तर फक्त मोठी आव्हानं स्वीकारतो. अशी आव्हानं स्वीकारतच मी इथपर्यंत आलो आहे. सहा महिन्यांपूर्वी मी असेच एक आव्हान स्वीकारले होते” असं सडेतोड उत्तर शिंदेंनी आपल्या भाषणातून विरोधकांना दिले.
काय म्हणाले होते आदित्य ठाकरे नेमकं ?
“महाराष्ट्रातील 13 खासदार आणि 40 आमदारांनी गद्दारी केली. पण त्या सर्वांना मी आजही चॅलेंज देतो. तुम्ही तुमच्या आमदारकी, खासदारकीचा राजीनामा द्या. त्यानंतर पुन्हा निवडून येता का ते पाहा. मी तर घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना देखील चॅलेंज दिलं आहे. मी वरळीमधून राजीनामा देतो. तुम्ही माझ्याविरोधात वरळीतून उभे राहा. मग पाहू तुम्ही कसे निवडून येता? असे आव्हान आदित्य ठाकरेंनी दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री शिंदेंना केलं होत.