मुंबई – मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्दावर राज ठाकरे यांनी आक्रमक पावित्रा घेत 4 मेपासून आपला कार्यक्रम हाती घेतला जाणार असल्याचा इशारा दिला. तसेच हिंदूंनी जिथे बांग सुरू असेल तिथं हनुमान चालिसा लावावी, अस आवाहन राज ठाकरेंकडून करण्यात आलं आहे. यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार दक्ष झालं आहे.
राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्यासाठी बाहेरच्या राज्यातील व्यक्ती महाराष्ट्रात धुडगूस घालण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिसांना कारवाईचे आदेश दिल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहखात्याकडून संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आहे.
दरम्यान कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलीस महासंचालकांना आदेश दिले आहे. आज मुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालक यांच्यात फोन वरून चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे.
राज्यात 4 मे रोजी परराज्यातील लोक येऊन कायदा सुव्यवस्था बिघडू शकतात असे रिपोर्ट गृह विभागाला मिळाले आहेत. त्यामुळे गृह मंत्रालयाने देखील पोलीस विभागाला खबरदारी घेण्याची सूचना केली आहे.