ठेकेदाराला दहा दिवसांचा अल्टिमेटम; दिव्यांचे जिओ टॅगिंग
पुणे – जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून 2018-19 मध्ये जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये सौर पथदिवे बसवण्यात आले. परंतु, त्यातील अनेक पथदिवे पहिल्याच दिवशी बंद पडल्यामुळे सदस्यांनी सर्वसाधारण सभेत गोंधळ घातला होता. दरम्यान, नव्याने रूजू झालेले मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी गंभीर दखल घेत, बंद पडलेले पथदिवे येत्या दहा दिवसात सुरू झाले पाहिजेत’. अशी सक्त ताकीद संबधित ठेकेदारांना देत ते सुरू झाले की नाही याची पाहणी करून अहवाल तयार करण्याबाबतचे आदेशही कृषी अधिकाऱ्यांना यावेळी देण्यात आले.
याबाबतच्या सूचना जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे आणि सीईओ यांनी दिल्या असून, त्यासाठी एक पथक नेमण्यात आले आहे. सौर पथदिवे बसविण्याचे टेंडर कृषी विभागाकडून औरंगाबाद येथील मे. पॉवरकॉन इलेक्ट्रो सिस्टीम्स या कंपनीला देण्यात आले. त्यानुसार 1 हजार 988 पथदिवे गावागावांमध्ये बसविण्यात आले. मात्र, यातील बहुतांश दिवे दुसऱ्या दिवशी लगेच बंद पडल्यामुळे सदस्यांनी सर्वसाधारण सभेत गोंधळ घातला.
त्यावेळी चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले. मात्र, ठोस निर्णय झाला नाही. अखेर मागील आठवड्यात सीईओ यांनी बंद पडलेल्या दिव्यांची माहिती देण्यासाठी जाहीरात प्रसिद्ध करून नागरिकांना आवाहन केले. तर आतापर्यंत दिवे बंदच्या तक्रारी साडेतीनच्या जवळपास आहे.
दरम्यान, आता पुढील दहा दिवसात बंद पडलेले दिवे सुरू करण्यासाठी एक पथक नेमण्यात आले आहे. तसेच दुरूस्ती झाल्यानंतर सौर पथदिवे चालू असल्याबाबतची तपासणी करण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतीच्या सरपंचांना लेखी पत्रान्वये सांगून रात्रीच्यावेळी प्रत्यक्षात सौर पथदिवे चालू असल्याबाबतचा फोटो पाठवण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. याशिवाय ही प्रक्रिया जीओ टॅग करण्यात येणार आहे.
याची पाहणी कृषी अधिकारी व विस्तार अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून पुढील दहा दिवसांमध्ये करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर दुरूस्ती पथकासाठी संपर्क क्रमांक देण्यात आला आहे. त्यानुसार ज्याठिकाणी दिवे बंद आहेत, त्याठिकाणी पथकाकडून दिव्यांची दुरूस्ती करण्यात येणार आहे. दरम्यान, सौरदिवे पुरवणाऱ्या पुरवठादारावर कारवाई करून, त्यांना उर्वरित पैसे देऊ नका असा जिल्हा परिषद सदस्यांनी मागणी केली होती. त्यानुसार त्यांना पैसे देण्यास थांबवले होते. परंतु पुरवठादाराला एक संधी देऊ करीत दुरूस्ती करण्यात येणार आहे.
गावातील पथदिवे बंद असल्यास संपर्क साधा
कृषी विभागाकडून गावांमध्ये बसविण्यात आलेले सौर पथदिवे बंद असतील तर ग्रामस्थांनी 9529974746 या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच तालुक्यातील विस्तार अधिकारी किंवा कृषी अधिकारी यांना संपर्क करून दिवे बंद असल्याची तक्रार नोंदवू शकता, अशी माहिती सीईओ आयुष प्रसाद यांनी दिली.