पुणे –कर्जत जवळच्या ढाक बहिरी किल्ल्यावर चढाईसाठी गेलेल्या औरंगाबाद येथील पाच ट्रेकर्सपैकी एकाचा 5 फेब्रुवारी रोजी तोल गेल्यामुळे खाली पडून मृत्यू झाला. अत्यंत अडचणीच्या ठिकाणी अडकलेला ट्रेकरचा मृतदेह गिर्यारोहकांच्यामदतीने डोंगरावरून खाली आणला.
या कार्यात पुण्यातील महाराष्ट्र माऊंटेनिअर्स रेस्क्यु कोऑर्डीनेशन सेंटर (एमएमआरसीसी) आणि खोपोलीच्या यशवंती हायकर्सचे सदस्य यांनी सहभाग घेतला होता. याबाबत एमएमआरसीसीचे समन्वयक राहुल मेश्राम म्हणाले, “ढाक बहिरी किल्ल्यावर चढाईसाठी गेलेल्या आणि तोल गेल्यामुळे मृत्यू झालेल्या ट्रेकरचा मृतदेह अडकलेला मृतदेह काढण्यासाठी मदतीबाबतचा व्हिडिओ सर्वत्र फिरत होता. जुन्नर येथील जितेन्द्र हांडे देशमुख यांनी “एमएमआरसीसी’ला याबाबत माहिती दिली.
त्यानंतर सेंटरचे सदस्य संतोष दगडे व त्यांचे सहकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यामागोमाग लगेचच यशवंती हायकर्सचे सदस्य ही आवश्यक साहित्य घेऊन घटनस्थळी पोहोचले. मृतव्यक्ती ढाक डोंगराच्या अत्यंत अवघड अशा अरुंद बाजूच्या उतारावर पडली असल्यामुळे, तसेच काळोख आणि घनदाट जंगलामुळे रेस्क्यू करणे अवघड होते.
सायंकाळी सहाच्या सुमारास सुरू झालेल्या रेस्क्यु ऑपरेशनला, मृतदेह सांडशी गावात आणण्यासाठी तब्बल 10 तास लागले. रेस्क्यू कोऑर्डिनेशन कमिटीचे मुख्य समन्वयक पद्माकर गायकवाड व इतर सदस्य ओंकार ओक, अमित गुरव यांनी योग्य समन्वय साधून मृतदेह पहाटे कर्जत येथे पोहचवला.
कर्जतचे संतोष दगडे व त्यांचे सहकारी अभि दगडे, सांडशी गावातील स्थानिक ऋषिकेश कदम, किरण शिर्के, संकेत कदम, संदेश शिर्के, मंगेश तुरडे, रोशन पेडणेकर, हरी ठोंबरे, लखन जाधव, गणेश मुकणे व गणेश सोमनाथ आणि यशवंती हायकर्सचे सदस्य महेंद्र भंडारे, अरविंद पाटील, अभिजित घरात, सौरभ रावल, भावेश शिर्के, राजू मोरे, रुपेश जाधव, प्रणित गावंड, संदीप पाटील यांनी या रेस्क्यू मोहिमेत महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली.