लतादिदींच्या उद्योगनगरीतील आठवणींना उजाळा
पिंपरी – स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनाने संपूर्ण देश हळहळला आहे. अशा या तपस्वी गायिकेच्या उद्योगनगरीशीदेखील निगडीत काही आठवणी आहेत. लता दिदींच्या जाण्याने या आठवणी आज पुन्हा ताज्या झाल्या. नाट्य परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी लतादिदी पिंपरी-चिंचवडकरांच्या कायम स्मरणात राहतील, असे सांगत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
भोईर म्हणाले, नादब्रम्ह परिवाराकडून होणाऱ्या कार्यक्रमाला आशा भोसले आल्या होत्या. त्याच कार्यक्रमात भाऊसाहेब भोईर व हृदयनाथ मंगेशकर यांची ओळख झाली. साधारण 2001 साली त्याच व्यासपीठावर नाट्यपरिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेच्यावतीने आशा ताईंच्या नावे पुरस्कार देण्याची घोषणा करण्यात आली. त्यानंतर भाऊसाहेब भोईर यांच्याशी चर्चा करताना हृदयनाथ मंगेशकरांच्या बोलण्यातून आले की, आपण आशा ताईंच्या नावे पुरस्कार देत आहोत तर सुरुवात आपण आनंदघन अर्थात लतादीदी यांना पहिला पुरस्कार देऊन करूयात. तसेच तू स्वतः दीदींची भेट घे आणि त्यांना भेटून हा पुरस्कार स्वीकारण्याचे निवेदन दे, असे सूचविले.
अनेकांनी मला सांगितले की दिदी फारशा कोणाशी बोलत नाहीत, स्वभावाने खूप कडक आहेत. त्यानंतरही मी धाडस करून लतादीदींना भेटण्यासाठी गेलो. पुण्यातील दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये शेवटच्या मजल्यावर दीदी बसलेल्या होत्या. माझ्या समोर लतादीदी आहेत, याचा मला विश्वासच बसत नव्हता. मी आल्याचे कारण सांगितल्यानंतर त्यांनी मला तो पुरस्काराचा स्विकार करण्यासाठी येत असल्याचे स्वत:च्या स्वाक्षरीचे पत्र दिले, आणि पुरस्कार वितरणाचा “तो’ कार्यक्रम शहराच्या वैभवातील ऐतिहासिक सोहळा ठरला.
तात्कालीन शिक्षणमंत्री कै. रामकृष्ण मोरे यांच्या हस्ते पाहिला अशा भोसले पुरस्काराचे वितरण करण्याचे ठरले. यावेळी सोहळ्यात मी सहज बोलून गेलो की, दीदी तुम्ही जग फिरता, भारत फिरता एव्हाना पुणे शहरात येऊन जाता, परंतु तुमची संगीत रजनी अद्याप आमच्या शहरामध्ये झालेली नाही. त्यावेळी त्यांनी स्मित हास्य केले कारण दीदी कमी बोलायच्या. त्यांची प्रतिक्रिया काय होती हे मला त्यावेळी समजले नाही परंतु काही महिन्यानंतर त्यांनी स्वत: पुढाकार घेत पिंपरी चिंचवड शहरात संगीत रजनीचा कार्यक्रम केला.
ही शहरवासियांसाठी अभिमानाची बाब ठरली. आशा भोसले यांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या पुरस्काराची शृंखला चालूच राहील, शहराच्या नावलौकिकात भर पडत राहील. मात्र, दिदींना हा पुरस्कार देण्याचे भाग्य आम्हा पिंपरी-चिंचवडकरांना मिळाले, हे खरेच आमच्यासाठी भाग्याचा क्षण ठरले. खरेतर लतादीदी सारख्या व्यक्ती जात नसतात. जोपर्यंत चंद्रसूर्य आहे तोपर्यंत त्यांच्या स्वरांचे वास्तव्य श्वासाच्या माध्यमातून माणसाच्या अंतकरणामध्ये राहील, हे नक्की.