पुणे, {प्रभात वृत्तसेवा} : महापालिकेत नोकरी मिळविण्यासाठी जवळपास ८० हजारांपेक्षा अधिक बेरोजगारांनी अभियंता, लिपिक, तसेच सहायक अतिक्रमण निरीक्षकांच्या परीक्षा दिल्या होत्या. मात्र, अवघी वर्षभर नोकरी केल्यानंतर १२ स्थापत्य अभियंत्यांनी पालिकेची नोकरी सोडली असतानाच, आता १० ते १५ लिपिक आणि टंकलेखक, तसेच १० सहायक अतिक्रमण निरीक्षकांनी पालिकेच्या सेवेचा राजीनामा दिला आहे.
त्यातील ४ लिपिक टकंलेखक, तसेच ५ सहायक अतिक्रमण निरीक्षकांचे राजीमाने महापालिका प्रशासनाने नुकतेच मंजूर केले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पहिल्यांदाच अशा प्रकारे नवनियुक्त कर्मचारी नोकरी सोडत असल्याने महापालिका प्रशासनही संभ्रमात आहे, तर घनकचरा विभागातील अभियांत्रिकी अभियंत्यांनीही राजीनामे दिले आहेत.
महापालिकेत मनुष्यबळाची कमतरता असल्याने पालिकेकडून गेल्या दोन वर्षांत वेगवेगळ्या पदांवरील १ हजार रिक्त जागा भरण्यात आल्या आहेत. यासाठी राज्यभरातील उमेदवारांनी परीक्षा दिल्या होत्या. त्यातून त्यांची निवड करण्यात आली होती. त्यानंतर महापालिकेने प्रतीक्षा यादीही जाहीर केलेली होती.
मात्र, आता वर्षभरानंतर त्यातील अनेक उमेदवार पालिकेची नोकरी सोडत असून, इतर शासकीय विभागांच्या परीक्षा पास झाल्याने नोकरी सोडण्यासाठी राजीनामे त्यांच्याकडून सादर करण्यात आले आहेत.
त्यानुसार प्रशासनही त्याची तपासणी करून ते मंजूर करत आहे. मात्र, मोठ्या प्रमाणात राजीनामे येत असल्याने त्याचा पालिकेच्या कामकाजावर परिणाम पडणार आहे, तसेच पुन्हा रिक्त जागांसाठी महापालिकेस भरती प्रक्रिया राबवावी लागणार आहे.