पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – गणेशखिंड रस्त्यावरील खैरेवाडी परिसरातील नागरिकांना पाणी मिळत नसल्याने येथील नागरिकांनी महापालिकेच्या निषेध करण्यासाठी “नो वॉटर नो वोट’ अशी भूमिका घेत लोकसभा मतदानावर बहिष्कार टाकण्याचे फलक लावण्यात आले होते. याची गंभीर दखल जिल्हा प्रशासनाने घेतली असून महापालिका आयुक्तांनी स्वत: या प्रकरणात लक्ष घालावे तसेच या भागासह शहरातील नागरिकांना पुरेसे पाणी द्यावे, असे आदेश दिले आहेत.
शहरात उन्हाची तीव्रता वाढली आहे. परिणामी शहरात पाण्याची मागणी वाढली आहे. त्यातच वीज पुरवठा खंडीत होत असल्याने महापालिकेच्या पाणी वितरणावरही त्याचा परिणाम होत आहे. त्यावर उपाय म्हणून महापालिकेने पाण्याचे टॅंकर पुरवणे सुरू केले आहे. मात्र, त्यानंतरही पाणी मिळत नसल्याने नागरिकांकडून टोकाची भूमिका घेतली जात आहे.
एका बाजूला लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान व्हावे आणि लोकांनी पुढे यावे म्हणून निवडणूक विभाग जनजागृती करत आहे. मात्र, दुसरीकडे लोक मुलभूत समस्यांच्या अभावामुळे मतदानावर बहिष्कार घालण्याची भाषा करत आहेत. त्याचा प्रकार खैरेवाडी येथे समोर आला. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश दिले आहेत.
पाणीच नसेल, तर द्यायचे कुठून?
खडकवासला धरणसाखळीत पाणीसाठा लक्षणीय खालावला आहे. त्यातच पाण्याची मागणी २५ टक्क्यांपेक्षाही अधिक वाढली आहे. अशा स्थितीत पुणेकरांना पुरेसे पाणी देण्यासाठी महापालिकेस काही कठोर निर्णय घ्यावे लागणार आहेत. त्यात दिवसाआड पाणी, बांधकामे-वाॅशिंग सेंटरला पिण्याचे पाणी वापरणे बंद करणे, पाणी चोरी रोखणे अशा उपायांचा समावेश आहे.
मात्र, लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर हा निर्णय घेतल्यास परिस्थिती चिघळण्याची शक्यता आहे. दुसऱ्या बाजूला जलसंपदा विभाग महापालिकेस जादा पाणी देण्यास तयार नाही. त्यामुळे पाण्याची बचतही करायची आणि वाढीव मागणीही पूर्ण करायची हे महापालिकेस शक्य नाही. त्यामुळे टंचाईची स्थिती उद्भवत असताना पाणीच नसेल, तर द्यायचे कुठून? अशा कोंडीत महापालिका प्रशासन सापडले आहे.