सातारा – जिल्हा परिषदेच्या स्वच्छतेच्या ठेक्यावरून जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वार परिसरात मंगळवारी सायंकाळी ठेकेदारांमध्ये वादावादी झाली. टेंडर मागे घेण्यावरुन झालेल्या या घटनेचे जिल्हा परिषदेत गंभीर पडसाद उमटले. संबंधित कामाची टेंडर प्रक्रिया रद्द करुन नव्याने टेंडर प्रक्रिया राबवण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी बांधकाम विभागाला दिल्या आहेत.
जिल्हा परिषदेच्या स्वच्छतेच्या टेंडरची प्रक्रिया बांधकाम विभाग उत्तरकडून राबवण्यात आली होती. या टेंडरवरुन मंगळवारी दोन ठेकेदार व त्यांच्या समर्थकांमध्ये वादावादी होऊन तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची गंभीर दखल जिल्हा परिषद प्रशासनाने घेतली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले, कार्यकारी अभियंता मोहसीन मोदी यांच्या उपस्थितीत याबाबत बैठक झाली. या टेंडरवरुन झालेल्या वादाबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. या टेंडरची प्रक्रिया रद्द करुन नव्याने टेंडर प्रक्रिया राबवण्याच्या सूचना ज्ञानेश्वर खिलारी यांनी यावेळी दिली.
दरम्यान, मंगळवारी जिल्हा परिषदेच्या दोन ठेकेदार व त्यांच्या समर्थकांमध्ये झालेल्या वादावादीनंतर बुधवारी जिल्हा परिषदेत या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरु होती. जिल्हा परिषदेत विशेषत: बांधकाम विभाग उत्तरमध्ये ठेकेदारांचा वावर जास्त असल्याने याठिकाणी वारंवार गर्दी होऊन वादाचे प्रसंग निर्माण होत आहेत. या विभागात ठेकेदारांची मक्तेदारी दिसून येत असून प्रशासनाचा कसलाही
धाक नसल्याने अशा घटना घडत असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. या वादावादीनंतर आता अधिकारी, कर्मचाऱ्यांशीही हुज्जत घालायला ठेकेदार कमी पडणार नाहीत, अशी भीती कर्मचाऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
मोदींचा प्रभाव दिसेना
जिल्हा परिषद बांधकाम विभाग उत्तरच्या अखत्यारित मुख्यालयातील कामही येत आहे. या विभागावर कामाचा ताण असला तरी यापूर्वी असलेले कार्यकारी अभियता श्रीपाद जाधव यांनी या विभागाला व ठेकेदारांना शिस्त लावली होती. या विभागाचा नव्याने पदभार घेतलेल्या मोहसीन मोदी यांचा मात्र सध्या तरी विभाग व ठेकेदारांवर प्रभाव दिसून येत नाही. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून या विभागाच्या कारभाराला शिस्त लावण्याची गरज निर्माण झाली आहे.