जंक्शनच्या नंदिकेश्वर विद्यालयात बालदिन साजरा
वालचंदनगर : बालपणापासूनच मुला मुलींनी आई वडिलासह कुटुंबातील सदस्याकडून चांगल्या सवयी, चांगले संस्काराचे शिक्षण मिळत गेले तर सुसंस्कृत पिढी निर्माण होण्यास मदत होत असते. म्हणूनच बालपणापासूनच मुलाच्या अंगी सुसंस्कृतपणा असणे अत्यंत काळाची गरज आहे, असे मत भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.
जंक्शन (ता. इंदापूर) येथील सदाशिव मोहोळकर शिक्षण संस्थेच्या नंदिकेश्वर विद्यालयात सोमवारी (दि. 14) बालदिन कार्यक्रम माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी पाटील बोलत होते. नुकतेच काठमांडू येथे झालेल्या नेपाळ भारत हिंदी शिक्षक व साहित्यकार संमेलनात हिंदी भाषा भूषण पुरस्काराने गौरवण्यात आलेले प्राचार्य चंद्रकांत सोळसेसह इंदापूर तालुक्यातील शिक्षकांचा सत्कार माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी नंदिकेश्वर विद्यालयाचे अध्यक्ष वसंत मोहोळकर, ऍड. हेमंत नरुटे, कर्मयोगीचे संचालक निवृत्ती गायकवाड, राहुल जाधव, बाळासाहेब पाटील, भूषण काळे, माजी सभापती नंदकुमार सोनवणे, हभप बाबामहाराज खारतोडे, प्रताप मोहोळकर, बाळासाहेब होळ, ऍड. दीपक लोखंडे, सरपंच रोहित मोहोळकर, उपसरपंच सुधाकर कणसे, विलास पवारसह इतर उपस्थित होते. सदाशिव मोहोळकर शिक्षण संस्थेचे सचिव व सरपंच रोहित मोहोळकर यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.