मंचर : लौकी (ता. आंबेगाव) येथील पाचघर वस्तीवरील वीर जवान सुधीर पंढरीनाथ थोरात (वय 32) यांच्यावर शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात मंगळवारी (दि. 15) सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.
रविवारी (दि. 13) दुपारी तीन वाजता घोडेस्वारी सराव करताना जवान सुधीर थोरात यांना वीरमरण आले. त्या वीर जवानाच्या अंत्यविधीसाठी पुणे जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर जनसागर लौकी गावांमध्ये जमा झाला होता, अशी माहिती सरपंच एकता अनिल थोरात आणि उपसरपंच मंगल विनोद थोरात यांनी दिली आहे. यावेळी प्रांताधिकारी सारंग कोडोलकर, तहसीलदार रमा जोशी, मंचर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सतीश होडकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या पोलीस बंदोबस्त मध्ये व भारतीय सैन्य दलाच्या बीएसएफच्या नियमानुसार सलामी देऊन अंतिम संस्कार करण्यात आले.
यावेळी फौजी सुधीर थोरात यांच्या पवित्र देहास अग्नीडाग त्यांचे चुलत बंधू स्वप्निल अनिल थोरात यांनी दिला. लौकी गावांमध्ये अंत्यविधी कार्यक्रमासाठी लौकी ग्रामपंचायत आणि समस्त ग्रामस्थ लौकी, पाचघरवस्ती यांच्यावतीने लौकी जिल्हा परिषद जवळील जुन्या ग्रामपंचायत इमारतीसमोर अंतिम संस्काराची मोठी जय्यत तयारी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली होती.
पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, भाजपचे किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संजय थोरात, भाजप तालुकाध्यक्ष ताराचंद कराळे, जुन्नर तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे माऊली खंडागळे, माजी सभापती वसंतराव भालेराव, माजी सभापती उषाताई कानडे, आंबेगाव तालुका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस अध्यक्ष अंकित जाधव, सरपंच राजश्री भालेराव, युवासेनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण थोरात यांच्यासह भारतीय सैन्य दलातील 30 बटालियन बीएसएफ मधील अधिकारी जगदीश घागरे, उपनिरीक्षक अभय सिंग, हवालदार गोपाळराव, वैभव शिंदे, आश्विनी लबडे यांच्यासह आदिजण उपस्थित होते. अंत्यविधीसाठी पंचक्रोशीतील विविध संस्थांचे पदाधिकारी, तरुण, ज्येष्ठ नागरिक, महिला, नातेवाईक, मित्रपरिवार व लहान मुले मोठ्या संख्येने उपस्थित होती.
यावेळी उपस्थित तरुणांनी वीर जवान फौजी सुधीर थोरात अमर रहे या घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला होता. अंत्यसंस्काराच्या समयी लौकी गावांमधून रथयात्रा सजवून त्यातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी बहुतांशी तरुण अग्रभागी भारतीय ध्वज घेऊन सहभागी झाले होते. भारत माता की जय, वीर जवान सुधीर थोरात अमर रहे या घोषणा सातत्याने सहभागी तरुण देत होते. या अंतिम समयी यात्रेमध्ये सहभागी झालेले अनेक जण भाऊक झाले होते. अंत्यविधी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक बाळासाहेब कानडे यांनी केले.