कोल्हापूर: कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात आलेल्या महापुराने शेतीसह छोटे मोठे उद्योग-व्यवसाय अशा विविध घटकांचे कोट्यवढीचे नुकसान झाले आहे.नागरिकांना महापुराच्या विळख्यातून लवकर सावरण्याची गरज आहे. महापुरामुळे फटका बसलेल्या नागरीकांचा आक्रोश सुरू आहे. हा आक्रोश शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आज शेकडो शेतकऱ्यांनी कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला.
अतिवृष्टीमुळे महापूर येऊन कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील शेकडो गावांना पुराचा वेढा पडला. एक हजार पेक्षा अधिक घरे या पुरामुळे धोकादायक बनली आहेत. ३५० यंत्रमाग कारखाने बाधित झाले आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळा अंगणवाडी आरोग्य केंद्रे यांना शंभर कोटी रुपयांचा फटका बसला आहे. या पुरामुळे चार लाख लोकांचे स्थलांतर झाले आहे. साखर कारखानदारीचे बाराशे कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. या परिस्थिती मुळे कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील शेतकरी आणि उद्योजकांच हजारो कोटी रुपयांचं नुकसान झाल आहे. सर्वसामान्य नागरिकांचे तर बेहाल होत आहेत या पूरग्रस्तांचा सध्या आक्रोश सुरू आहे. आज पर्यंत पूरग्रस्तांना मिळालेली रक्कम ही तुटपुंजी आहे. म्हणून आज आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
आक्रोश मोर्चा मध्ये शेतकरी,व्यापारी,उद्योजक,व्यवसायिक, यांच्यासह पूरग्रस्त असलेले सामान्य नागरिक सहभागी झाले होते. या मोर्चाचे नेतृत्व माजी खासदार राजू शेट्टी आणि काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी केले. या मोर्चावर टीका करताना महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सरकार मदत करत असताना मोर्चाद्वारे शिमगा करून काही साध्य होणार नसल्याची टीका केली होती. त्याला उत्तर देताना शिमगा करण्याची वेळ कोणी आणली असा प्रतिसावल राजू शेट्टी यांनी केला.तसेच कधी हातात खुरपे घेऊन शेतात काम केलं असत तर या मोर्चाची गरज त्यांना समजली असती अशी टीका केली आहे.