वेल्हे – वेल्हे तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून दूषित वातावरण तयार होत आहे. या वातावरणामुळे तरकारी तसेच इतर पिकांसह नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. यामुळे सामान्य नागरिकांसह शेतकरी हैराण झाले आहेत.
गेल्या काही दिवसापासून सर्वत्रच वातावरणात बदल होत आहे. यामुळे हाता तोंडाशी आलेले पीक पीक वाचवता वाचवता या भागातील शेतकरी मेटाकुटीला आला आहे. पावसाळा संपला हिवाळा चालू झाला आणि हंगामी रब्बी पीक घेण्यास बळीराजांनी सुरूवात केली. परंतू यावेळीही अस्मानी संकाटांनी पाठ सोडली नाही. कधी ढगाळ वातावरण तर मध्येच रिमझिम पाऊस, सकाळ, संध्याकाळी दाट धुक्यांची चादर अशा एकापाठोपाठ संकाटांच्या भडीमारामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.
वामानात होणाऱ्या दररोजच्या बदलामुळे शेतातील भाजीपाला तसेच फळभाज्यांवर परिणाम होत आहे. शेतातील पालेभाज्या व फळभाज्यांवर मोठ्या प्रमाणात रोगराईचा प्रादूर्भाव झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. वेलवर्गीय फळभाज्यांना या बदलत्या हवामानाचा फटका बसत आहे. वेलाला आलेली फुले व फळे गळून पडत आहेत. तसेच फळांना देखील किडीचा प्रादुर्भाव होत आहे.
यामध्ये पावटा, मेथी, गहू, हारभरा, वांगी या पिकांवर पांढऱ्या रंगाच्या किड्यांचा प्रादूर्भाव जास्त प्रमाणात होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. याबरोबर नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे. लहान मुले, नागरिकांना सर्दी, खोकला, ताप, हातपाय गळणे यांसारख्या आजारांनी ग्रासले आहे.