पुणे – जुना कांदा संपत आला तरी अद्याप नवीन कांद्यांची म्हणावी तेवढी आवक सुरू झाली नसल्याने कांद्याचे दर अद्याप प्रतिकिलोला पन्नास ते शंभर रुपये किलोच्या आसपास आहे. या पार्श्वभूमीवर केंद्राने कांद्याचा साठवणूकीवर मर्यादा घालण्याचा निर्णय घेतला आहे.
याबाबत केंद्र सरकारने विविध राज्यातील पणन मंडळाकडून साठवणुकीबाबतचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे.कांद्याचे दर आणखी काही दिवस चढे राहणार असल्याची शक्यता असल्याने केंद्राने हा निर्णय घेतला आहे. केंद्राच्या ग्राहक व अन्न पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी राज्यात केलेल्या सर्व्हेनुसार महाराष्ट्रात उपलब्ध असलेल्या कांद्याची साठवणूक शेतकऱ्याकडे नसून व्यापाऱ्याकडे अधिक होत आहे. त्यामुळेच कांद्याच्या साठवणुकीवर मर्यादा घालण्यात येत आहे. त्यामुळे घाऊक व्यापाऱ्यांसाठी पन्नास टन आणि किरकोळ व्यापाऱ्यांसाठी दहा टन करण्यात आली आहे.
पणन मंडळाच्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षी डिसेंबर मध्ये कांद्याची तब्बल 41 लाख 32 हजार क्विंटल आवक झाली होती. तीच आवक यावर्षी फक्त 19 लाख 82 हजार 220 क्विटल एवढी आहे.गेल्या वर्षी क्विटलचा दर हा 937 रुपये होता तर यंदा सुमारे चार हजार रुपये आहे.