शिरूर (प्रतिनिधी) : टाकळीहाजी व परिसरात मुंबई येथून रेड झोन असलेल्या धारावी येथील बारा नागरिक प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक करुन टाकळी हाजीत दाखल झालेच कसे ? तरी सदर घटनेला जबाबदार कोण ? असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे. पोलीसांना सांगुन पण अधिकारी डोळे झाकपणा करीत असल्यामुळे जनतेचे आरोग्य धोक्यात येणार आहे. ज्या मार्गाने हे नागरिक आले त्या मार्गातील जिल्हा तालुका सीमा बंद असताना पोलीस कर्मचारी काय करत होते ? असा सवाल आता पुढे येत आहे.
जिल्ह्याच्या सर्व सीमा पूर्ण बंद असताना ठाणे, पुणे व अहमदनगर मधुन निघोज कुंड मार्गे शिरुर हद्दीत सदर नागरिकांच्या वास्तव्यामुळे टाकळी हाजी परिसरातील नागरिक भयभीत झाले आहे. सदरचे नागरिक पारनेर तालूक्यातील अळकुटीमार्गे आल्याने देविभोयरे येथे देखिल तीन ते चार नागरिक संबंधित गाडीतून उतरले असून संबधित गाडी निघोजमार्गे असणारे सर्व चेकपोस्ट पास करीत टाकळी हाजीत आलीच कशी, हा देखील मोठा प्रश्न निर्माण होत आहे. तरी संबधित नागरिकांमुळे या परिसरात कोरोनाच्या भीतीने दहशत निर्माण झाली आहे. त्यांची चौकशी करण्यांची गरज आहे .
अजूनही एका गावात देखील कोरोनाने मृत्यू झालेल्याचे नातेवाईक दाखल झाले असल्यांचे समजते तसेच धारावीचे नागरिक निघोज व टाकळी हाजी चेकपोस्टमधून आले तेव्हा संबंधित चेकपोस्टवर एकही होमगार्ड अथवा पोलीस कर्मचारी नसल्यानेच ते टाकळी हाजीत दाखल झाले आहे. तसेच दोन दिवसांपुर्वी टाकळी हाजीपासून ५ किमी अंतरावर असणाऱ्या निघोज येथे घाटकोपर येथून आलेल्या तरुणाचा कोरोनाने मृत्यू झाल्याने शिरुर तालूक्यातील टाकळी हाजी, जांबूत, वडनेर, पिंपरखेड, चांडोह ,फाकटे आदि गावे भयभीत झाली असून या भागातील सर्व सीमा नागरिकांनी बंद केल्या आहेत. तसेच या परिसरात पुणे व मुंबईचे अनेक नागरिक आले आहे. परंतु पोलिस खाते डोळेझाक करीत आहे. आरोग्य व महसूल व ग्रामसेवक खाते चांगले काम करीत असून पोलिस खात्याच्या हलगर्जीपणामुळे विनापरवाना नागरिक दाखल होत असल्याने संबंधित खात्याने वेळीच लक्ष देवून येथील कायदा व सुव्यवस्था आबाधित राखण्यासाठी प्रशासनाने जागरुक राहण्याची गरज आहे.
सकाळी बातमी समजताच टाकळी हाजीचे ग्रामसेवक राजेश खराडे व माजी उपसरपंच अजित गावडे व मोठया प्रमाणात ग्रामस्थ जमले. यांनी पोलिस चौकीमध्ये जाऊन माहिती दिली. मात्र दुर्देव ऐवढे की पोलिस चौकी समोरील घरासमोर बारा लोकाना मुंबई मधील टेम्पो घेऊन आला व सोडूनही पसार झाला तरी त्यांचा थांगपत्ता पोलिसांना लागला नाही. मात्र वार्ता गावात पोहचल्यानंतर ग्रामस्थ पोलिस स्टेशनला गेल्यावर पोलिस जागे झाले . त्यांनंतर ग्रामविकास अधिकारी राजेश खराडे व आरोग्य अधिकारी प्रदीप बिक्कड व ग्रामस्थ पोलिस त्यांच्या घरी जाऊन माहीती घेतली कोणतीही परवानगी नसताना हे लोक चार जिल्हे पार करीत थेट पोलिस स्टेशन समोरील आपल्या घरातच दाखल झाले तरी पोलिसांना तपास नाही तर जनतेची सुरक्षा कोणाच्या हाती, असा प्रश्न निर्माण झाला आहे .
त्या लोंकाना सोडणाऱ्या वाहनावर पोलिस गुन्हा दाखल करणार का? असा सवाल जनतेमधुन व्यक्त केला जात आहे. त्याबाबत चौकीच्या वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्या सोबतही संपर्क साधला असता त्यांनी विषय व जबाबदारी टाळण्यातचं धन्यता मानली आहे. ग्रामसेवक राजेश खराडे व आरोग्य अधिकारी बिक्कड यांनी तहसिलदार लैला शेख यांच्या सुचनेनुसार सर्वाना क्वारंटाईन केले आहे , मात्र वरीष्ठ अधिकारी वर्गाने या गंभीर विषयाकडे कानाडोळा केला असुन, असे तालुका जिल्हा सीमा सुरक्षित नसल्यामुळे मुंबई पुण्यामधील लोंढे रोखायचे कसे? असा सवाल जनता व्यक्त करीत आहेत .
रक्षकच झाले भक्षक…
जनतेच्या रक्षणासाठी टाकळी हाजी चौकीत खाकीच्या दिमतीला नवी सुमो गाडी दिली असुन त्यांनी कोरोनो काळात सीमा बंदी बाहेरील लोक यांच्याकडे लक्ष देऊन कारवाई करण्याऐवजी अवैध धंदे यांच्या नावाखाली सामान्य जनतेची पिळवणुक करण्याचे काम सुरू असल्याची चर्चा आहे . त्यामुळे सामान्य जनतेमधे प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे .
ही अत्यंत गंभीर बाब आहे : जिल्हाधिकारी
धारावी सारख्या रेड झोन मधुन लोक पोलिस बंदोबस्त असतानाही शिरूर तालुक्या मधे येतात तेही पोलिस चौकी समोर गाडी सोडुन जाते ही अंत्यत गंभीर बाब असुन चौकशी केली जाईल असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले .
त्यामुळे ग्रामीण भागात कोरोनोचे संकट निर्माण होऊ शकते : माजी आमदार पोपटराव गावडे
रेड झोन मधील मुंबई ,पुणे येथील लोक तालुक्यात विना परवाना अवैध रित्या येत आहेत जिल्हा व तालुका सिमा बंद आहेत असं शासन व पोलिस सागत असताना लोक तालुक्यात येतात कसे पोलिस खाते या गोष्टी गांभीर्याने घेत नाहीत त्यामुळे ग्रामिण भागात कोरोनोचे संकट निर्माण होऊ शकते .टाकळी हाजी पोलिस चौकी कोरोनोच्या काळात फक्त वसुली चौकी झाली असुन जनतेच्या सुरक्षेवर त्यांचे लक्ष नाही असा आरोप शिरूर चे माजी आमदार पोपटराव गावडे यांनी करीत पोलिस खात्यांच्या कामाबद्दल नाराजी व्यक्त केली .
चौकशी करू : संदीप पाटील
मुंबई मधील धारावी येथुन विनापरवाना नागरीक टाकळी हाजी येथे दाखल झाले ते कसे आले याबाबत चौकशी करू असे पोलिस अधिक्षक संदीप पाटील यांनी सांगितले .