पिंपरी – एकेकाळी सायकल हे प्रवासाचे मुख्य साधन होते. परंतु काळाच्या ओघात हळू-हळू सायकल दिसेनासी झाली. आता मात्र पुन्हा एकदा नागरिक सायकलकडे वळताना दिसून येत आहेत. आरोग्याच्या दृष्टीने सायकलिंग हा चांगला व्यायाम मानला जातो, तसेच इंधनाच्या दरातील वाढही सायकलसाठी पूरक ठरत आहे.
सायकलींच्या विक्रीत वाढ झाली असली तरी गेल्या काही दिवसांपासून त्यांच्याही किमतीमध्ये वाढ झाली आहे. तरीही सर्वसामान्यांना परवडणाऱ्या सायकलीचा ट्रेंड पुन्हा आल्याचे दिसत आहेत. भारत हा जगातील सर्वांत मोठा सायकल उत्पादक देश आहे. पूर्वी सायकल हेच प्रवासाचे साधन होते. त्यामुळे घरोघरी सायकल दिसत होती.
मात्र, मध्यंतरीच्या काळात सायकलीचा वापर शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांपुरता मर्यादित राहिला होता. दिवसेंदिवस होत असलेल्या इंधन दरवाढीमुळे आता पुन्हा नागरिक सायकल किंवा इलक्ट्रिक वाहनांकडे वळत आहेत. त्यातून पर्यावरण संरक्षणाचा संदेशही देत आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्याचे महत्व लोकांना समजू लागले आणि लोक व्यायामाकडे वळाले. सुदृढ आरोग्यासाठी अनेकजण सकाळी सायकलिंग करताना दिसतात. त्यामुळे पुन्हा लोक सायकलीची खरेदी करू लागले. त्यात दिवसेंदिवस होणारी इंधनवाढ ही कारणीभूत ठरू लागली असून सर्वसामान्यांना परवडणारी सायकलीचा ट्रेंड पुन्हा आल्याचे दिसत आहेत.
किमतीत वाढ सततच्या इंधन दरवाढीबरोरबच गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या रशिया-युक्रेनच्या युद्धाचा परिणाम भाववाढीवर झाला आहे. कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाली आहे. सायकल बनविण्यासाठी लागणाऱ्या स्टील, रबर, ऍल्युमिनियम, प्लास्टिक यांच्या किमती वाढल्या आहेत. इंधर दरवाढीचा परिणाम वाहतुकीवर झाला आहे. त्यामुळे वाहतूक खर्च वाढला. स्टीलची किंमत वाढली असून, अन्य कच्च्या मालाचेही दर वाढलेले आहेत. त्यामुळे किमान 200 रुपयांनी सायकलीच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे, असे रावेत येथील पी. आर. इन्टरप्रायझेस व गो ग्रीन सायकलचे व्यावसायिक अजित कुमार यांनी सांगितले.
गियरच्या सायकलला मागणी
गियरच्या सायकलला सर्वाधिक मागणी आहे. दहा किलोमीटपर्यंतचा प्रवास करण्यासाठी साधी सायकल तर त्यापेक्षा जास्त प्रवास करणार असेल तर गियरच्या सायकलला पसंती दिली जाते. साध्या सायकलची किंमत 8500 रुपयांपासून पुढे तर गियरच्या सायकलची किंमत 12 हजार 500 रुपयांच्या पुढे आहेत. तसेच काही ठिकाणी इलक्ट्रिक सायकलींनाही मागणी आहे. ग्राहक आवश्यकतेनुसार खरेदी करतात. सध्या मार्च महिना असल्याने ग्राहक चौकशी करून जातात, असे अजित कुमार यांनी सांगितले.