सोनम परब
स्टार किड्स हे नेहमीच माध्यमांच्या “पापाराझ्झी’च्या रडारवर असतात. स्टार किड्सचा पेहराव, जीवनशैली, शिक्षण, मित्र-मैत्रिणी याबाबत सतत गॉसिपिंग सुरू असते. ते कितपत खरे असते, हे माध्यमांनाच ठाऊक. परंतु प्रेक्षकांना आपल्या वाहिन्यांकडे खेचून घेण्यासाठी त्यांच्याविषयी मसालेदार बातम्या पुरवल्या जातात. यात संबंधिताचे किती नुकसान होत आहे, याचा विचारही होत नाही. आता आर्यन खान हा पडद्यावर वडिलांचा वारसा चालवणार आहे की नाही, याबाबत अद्याप खान कुटुंबीयांकडून कोणताही खुलासा झालेला नसताना माध्यमे मात्र त्याला एखाद्या जेम्स बॉंडप्रमाणे पडद्यावर आणू इच्छित आहेत.
असाच अनुभव ट्विंकल खन्ना आणि अक्षयकुमारचा मुलगा आरव तसेच अमृता व सैफचा मुलगा इब्राहिम किंवा अमिताभची नात अगस्त्या आणि नव्या नवेली, काजोल आणि अजय देवगणची मुलगी न्यासा आदींना देखील येत आहे. या स्टार किड्सचे पडद्यावर आगमन होणार आहे की नाही हे अजून काहीच ठरलेले नाही; परंतु माध्यमे मात्र त्यांची आतुरतेने वाट पाहात आहेत. दुसरीकडे गुणवत्ता विरुद्ध घराणेशाही या आधारावर काहींना दुषणं दिली जातात.
एवढेच नाही तर मुंबईकर विरुद्ध परप्रांतीय अशी स्पर्धा तयार करून यात स्टार किड्सला ओढले जात आहेत. अभिषेकने इंडस्ट्रीत पाऊल टाकले तेव्हा अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केली गेली. त्यामुळे त्याची प्रतिमा अमिताभ यांचे वलय तोडू शकली नाही आणि परिणामी तो बॉलीवूडमध्ये फारसे यश मिळवू शकला नाही. सध्याच्या काळातही काही नायक-नायिकांना त्यांच्या पाल्यांवरून असाच अनुभव येत आहे.
परदेशातील अर्धवट शिक्षण पूर्ण करणारी न्यासा देवगणबाबत आई काजोल ही तिच्या बॉलीवूडमधील एंट्रीबाबत नेहमीच सावध भूमिका घेते. न्यासाचे शिक्षण अजूनही पूर्ण झालेले नाही. तिचे कोणतेही मत जाणून घेतल्याशिवाय माध्यमांकडून तिला बॉलीवूडच्या एंट्रीचा मुहूर्त देखील शोधला जात आहे. याबाबतीत अपवाद राहिली ती बोनी कपूर आणि श्रीदेवीची लहान कन्या खुशी आणि संजय कपूरची मुलगी शनाया कपूर. त्यांनी बॉलीवूड उद्योगात प्रवेश करण्याचे संकेत दिले आहेत. परंतु कधी आणि केव्हा याबाबत मात्र अद्याप उलगडा झालेला नाही. तरीही माध्यमांकडून वेगवेगळ्या प्रकारचे गॉसिपिंग केले जात आहे.
चंकी पांडेची कन्या अनन्या पांडेदेखील स्टार किड् असून तिच्याबाबतीत माध्यमात चर्चा सतत रंगत असते. ती म्हणते, प्रत्येक व्यक्तीप्रमाणे माझीदेखील ओळख आहे. माझे वडील हे लोकप्रिय असले तरी त्यांची प्रतिभा किंवा स्टारडम हे माझ्या कामापेक्षा अगदी वेगळे आहे. ते खूपच प्रतिभावान आणि व्हर्सिटायल आहेत. त्यांच्याशी माझी बरोबरी होऊ शकत नाही. त्यांच्या अभिनयाची उंची आपण गाठू शकत नाही. त्यांची कन्या असल्याने नाव खराब होऊ दिले नाही.
आपला पहिला चित्रपट “स्टुडंट ऑफ द ईअर-2′ मध्ये माझ्या अभिनयाबाबत प्रेक्षकांनी किंवा समीक्षकांनी नोंदवलेले मत हे नकारात्मक असले तरी त्यापासून प्रेरणा मिळाली आहे, असेही ती स्पष्ट करते. तूर्त अनन्या ही स्वत:शीच स्पर्धा करत असल्याचे दिसून येते. 1980-90 च्या दशकात रूपेरी पडद्यावर धुमाकूळ घालणारे अनिल कपूर आणि सनी देओल यांच्या चिरंजीवांना त्यांच्या वलयाचा फायदा मिळाला नाही आणि मिळाला असला तरी त्यांचे नुकसानच अधिक झाले आहे.
अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन कपूरने गुलजार यांनी लिहिलेल्या आणि राकेश ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित “मिर्जिया’ चित्रपटातून अभिनयाचा नारळ फोडला. त्याने चित्रपटात शंभर टक्के योगदान दिले. तसेच सनी देओलचा मुलगा करणचा पहिला चित्रपट “पल पल दिल के पास’ हा स्वत: सनी देओलने दिग्दर्शित केला. तो लॉकडाऊनच्या अगोदर प्रदर्शित झाला. परंतु बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने पाणीदेखील मागितले नाही.
हर्षवर्धन म्हणतो, वडील अनिल कपूर हे टपोरी स्टाइलमुळे प्रसिद्ध आहेत. “माय नेम इज लखन’च्या अदाकारीने सिनेसृष्टीवर छाप पाडणारे अनिल कपूर यांचा अभिनय आणि माझा अभिनय वेगळा आहे. आपणही वडिलांप्रमाणेच काम करावे, हे आवश्यक नाही. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाशी आपण मिळतेजुळते काम करू, असेही नाही. हर्षवर्धनच्या चित्रपटाची दखल प्रेक्षकांनी घेतली नाही आणि माध्यमांनीही नाही.
करण देओलने काही गोष्टी प्रामाणिकपणे मान्य केल्या. केवळ वडीलच नाही तर आजोबा धर्मेंद्र, काका बॉबी देओल, अभय देओल यांच्या स्टारडमवरून आपल्याला खूप दबावातून जावे लागल्याचे तो म्हणतो. या स्टार किड्सने पडद्यावर नशीब आजमवण्याचा प्रयत्न केला. पण तो अपेक्षेप्रमाणे यशस्वी ठरला नाही. त्याचवेळी ऐश्वर्या-अभिषेकची कन्या आराध्या, करिना-सैफचा मुलगा तैमूर, अनुष्का शर्माची कन्या यांच्या भवितव्यावरून आतापासून सोशल मीडियावर कयास बांधले जात आहेत. त्यांचे भाकित मिर्चमसाला लावून वर्तविले जात आहे.
1990 च्या दशकातील डॅशिंग नायक सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टीचा पहिला चित्रपट “तडप’ने बॉक्सवर जेमतेम 25 कोटींचा धंदा केला. ज्युनिअर शेट्टीचे सर्वत्र कौतुक होत असतानाही त्याची जादू पडद्यावर दिसली नाही. समीक्षकांनी देखील शेट्टीच्या अभिनयाबाबत नाक मुरडले. एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्याला घराणेशाहीवर प्रश्न विचारण्यात आला. तो म्हणतो, की मूव्हिज हा शोबिज आहे. जेव्हा मूल्यांकनाची वेळ येते तेव्हा “दूध का दूध, पानी का पानी’ असे होते.
अर्थात, गुणवत्तेच्या कसोटीवर अभिनय पात्र ठरला नाही तर प्रेक्षकरूपी असलेला पंच त्याला बाद करतो. असे अनेक कलाकार बॉलीवूडमध्ये आहेत. एकुणातच सुनील शेट्टीच्या नावाचा दबाव अहानवर होता. हा दबाव तो पेलू शकला नाही.
बोनी कपूर आणि श्रीदेवीची कन्या जान्हवी कपूरची सुरुवात करण जोहरचा “धडक’ने आणि घराणेशाहीने सुरू झाली. अर्थात, श्रीदेवी यांच्या मृत्यूने काही प्रमाणात जान्हवीला सहानभूती मिळाली. श्रीदेवी आणि जान्हवीची सतत तुलना केली जाते; परंतु ती म्हणते, अशी तुलना करणे म्हणजे माझ्यावर अन्याय करण्यासारखे आहे.
कारण आईचे सौंदर्य हे बॉलीवूडमधील निवडक सौंदर्यवतीत गणले जाते. तिच्यापुढे मी काहीच नाही. घराणेशाही किंवा आपल्या कुवतीनुसार मेहनतीचा विषय येतो तेव्हा मी नायिका होण्यासाठी शंभर टक्के मेहनत करते. म्हणूनच आजपर्यंत इथे येऊन पोहोचले अन्यथा प्रेक्षकांनी मला मागेच नाकारले असते.