एखाद्या चित्रपटात कोणत्याच त्रुटी नसतील तर तथ्य नसलेले कोणतेही कारण उकरून त्यावर हल्ले केले जात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
आपल्या देशात अनेक चित्रपटातील मजकूर, दृश्य, संवाद यावरून नेहमीच वाद निर्माण झाले. चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकारांवर खटले दाखल केले गेले आहेत. परिणामी अनेकदा वादग्रस्त दृश्य वगळावे लागले तर काहीवेळा नावच बदलण्याची वेळ निर्मात्यांवर आली आहे. कलाकारांना अनेकदा कोर्टात चकरादेखील माराव्या लागल्या आहेत. सध्या “आदिपुरुष’ चित्रपटावरून वाद निर्माण झालेला असताना तत्पूर्वी यावर्षी काही चित्रपटांमुळे वादंग निर्माण झाला होता.
आमीर खानचा बहुचर्चित “लालसिंह चढ्ढा’ हा चित्रपट आमीर खानच्या जुन्या वक्तव्यावरून वादात अडकला. 2015 मध्ये त्याने एका मुलाखतीत दिलेल्या एका वक्तव्यावरून चित्रपटाला देशभरातून विरोध झाला. या चित्रपटाचे कलेक्शन एवढे कमी राहिले की, ओटीटीवर देखील हा चित्रपट प्रदर्शित करण्यास कोणी तयार नव्हते. “काली’ चित्रपटाचाही यानिमित्ताने उल्लेख करता येईल. अलीकडेच आलेला डॉक्युमेंटरी चित्रपट “काली’च्या पोस्टरने नवीन वादाचा जन्म झाला. त्यात कालीदेवीचा अवमान करण्यात आला आहे. याशिवाय रणबीर कपूरने दिलेल्या एका मुलाखतीमुळे त्याचा “ब्रह्मास्त्र’ चित्रपट ट्रोल झाला. बजरंग दलाने अभिनेत्याच्या वक्तव्यावरून गोंधळ घातला. या चित्रपटात अभिनेता हा चप्पल घालून एका मंदिराची घंटा वाजवताना दिसतो. शेवटी हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला.
आता “आदिपुरुष’ चित्रपटाकडे वळू. ओम राऊत यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून हिंदी आणि तेलुगूत एकाच वेळी प्रदर्शित झालेल्या चित्रपटात प्रभासने राघव, कृती सैनने जानकी आणि सैफ अलीखानने लंकेशची भूमिका साकारली आहे. वास्तविक या चित्रपटाचा टिजर प्रदर्शित झाल्यानंतर हिंदुत्ववाद्यांनी नाराजीचे सूर आळवण्यास सुरुवात केली. यात उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य, बृजेश पाठक तसेच मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्र यांचा समावेश करता येईल. नरोत्तम मिश्र यांनी दिलेल्या इशाऱ्यात चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्य वगळले नाही तर कायदेशीर कारवाई करू, असे सांगितले आहे.
अयोध्येतील राम मंदिराचे प्रमुख पुजारी सत्येंद्र दास यांनी चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. सत्येंद्र दास यांनी एका वर्तमानपत्राला सांगितले, की भगवान राम, हनुमान तसेच रावण यांचे चित्रपटात साकारलेले पात्र हे महाकाव्यात दिलेल्या वर्णनानुसार नाही आणि त्यामुळे अस्मितेला धक्का बसला आहे. याशिवाय चित्रपटाला संतांकडून विरोध केला जात असल्याने बृजेश पाठक यांनी आक्षेपाची धार अधिक तीव्र केली आहे. संत काय म्हणतात, त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे, असे पाठक म्हणतात.
उत्तर प्रदेशचे दुसरे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनीदेखील चित्रपटाला विरोध केला आहे. सध्याचे वातावरण पाहता या मुद्द्यावरून होणाऱ्या राजकारणात कोणीच मागे राहू इच्छित नाही, असे दिसते. कारण भावनेचा अनादर होत असल्याचे कारण सांगून प्रखर भूमिका मांडणारी मंडळी ही कडवे हिंदुत्ववादी म्हणून समोर येत आहेत. अर्थात हिंदूंच्या भावना कशामुळे दुखावल्या आहेत? हा खरा प्रश्न आहे.
भाजपच्या प्रवक्त्या मालविका अविनाश म्हणाल्या की, फोटोत उडणारा रावण हा भारतीय वाटत नाही. त्याच्या डोळ्याला निळ्या रंगाचा मेकअप आहे आणि त्याने चमड्याचे जॅकेट घातलेले आहे. अशा रितीने मोडतोड करत इतिहास मांडला जात आहे. मात्र, ते अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावावर अशा प्रकारचे कृत्य करू शकत नाही, असाही इशारा मालविका यांनी दिला. मध्य प्रदेशचे मंत्री नरोत्तम मिश्र म्हणाले, की चित्रपटात हनुमान यांना चमड्याचा पेहराव दाखवला आहे.
प्रत्यक्षात धर्मग्रंथात त्यांचे वस्त्र वेगळे सांगितले आहे. या वेशभूषेमुळे धार्मिक भावना दुखावल्या आहेत. आज आपल्या देशात कला जगतातून अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर जोर दिला असताना अशा प्रकारचे मांडण्यात येणारे तर्क विचार करायला लावणारे आहे. वास्तविक कोणताही कलाकार किंवा चित्रपट निर्माता हा अचूक असणे गरजेचे नाही. देवदेवतांचे सादरीकरण करणे हा नेहमीच कलात्मक संशोधनाचा विषय राहिला आहे. त्यामुळे कदाचित पारंपरिक सादरीकरणाचे समकालिन सादरीकरणावर वर्चस्व राहिलच असे नाही. तसेच प्रत्येक निर्माता हा राजकीय नेता किंवा संघटनांचे म्हणणे ऐकून त्यानुसार कृती करू लागला तर त्यांच्यासाठी कोणत्याही चित्रपटाचे दिग्दर्शन करणे कठीण होऊ शकते.
दुर्दैवाने गेल्या काही काळापासून असाच अनुभव येत आहे. आजच्या घडीला काही हिंदी चित्रपट निर्माते दबावाखाली आहेत. त्यामुळे आवडीच्या विषयावर कलाकृती निर्माण करण्यापासून ते हात आखडता घेत आहेत. याचा परिणाम चित्रपटाच्या कथानकांवर होत आहे. म्हणूनच प्रदर्शित होणारे रुचीहिन चित्रपट तिकीटबारीवर आपटताना दिसत आहेत. “आदिपुरुष’ चित्रपटाने वाद निर्माण होण्याची ही पहिली वेळ नाही. यावर्षीच नाही तर गेल्या अनेक वर्षांपासून वादग्रस्त चित्रपटांची संख्या लक्षणीय राहिली आहे. यातील काही प्रमुख चित्रपटांचा उल्लेख इथे करता येईल.
बॅंडिट क्वीन : दरोडेखोर फुलनदेवी यांच्या जीवनावर आधारित असलेला 1994 चा बॅडिट क्वीन चित्रपट वादात पडला. शेखर कपूर दिग्दर्शित चित्रपटात असभ्य भाषा, अश्लील मजकूर, जातिवाचक मतमतांतरे असल्याने वाद निर्माण झाला. अर्थात बॅंडिट क्वीनने सर्वश्रेष्ठ चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार पटकावला होता.
फायर : 1996 मध्ये प्रदर्शित लेस्बियनिज्म संकल्पनेवर आधारित असलेल्या चित्रपटाला शिवसैनिक आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध केला होता. अर्थात निर्मात्यांनी हा चित्रपट वेगळ्या धाटणीचा असल्याचे म्हणणे मांडले होते. शबाना आझमी यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका बजावली होती.
सिन्स : 2005 मध्ये शायनी आहुजाचा सिन्स चित्रपट हा सत्य घटनांवर आधारित होता. यात कॅथोलिक पाद्रीचे एका युवतीसमवेत प्रेमसंबंध असल्याचे दाखविले आहे. म्हणून या चित्रपटाला विरोध करण्यात आला. या चित्रपटाला अनेक टीव्ही चॅनल्सने देखील पाठिंबा दिला नाही.
पद्मावत : 2018 मध्ये संजय लीला भन्साळीच्या या चित्रपटाला राजस्थानच्या राजपुतांनी तीव्र विरोध केला. या चित्रपटात चुकीची माहिती सादर केल्याचा आरोप करण्यात आला. एवढेच नाही तर चित्रपटाच्या कलाकारांवर बक्षीस देखील जाहीर करण्यात आले होते.
उडता पंजाब : अंमली पदार्थाची पार्श्वभूमी असलेला उडता पंजाब हा 2016 मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाला पंजाबी नागरिकांनी तीव्र विरोध केला. तसेच अनेक दृश्य कापण्यात आले. सेन्सॉर मंडळाने या चित्रपटातील 89 कापण्यास सांगितले होते.
सोनम परब