नवी दिल्ली: भारतीय आणि चिनी लष्करामध्ये धुमश्चक्री उडून 20 जवान शहीद झाले. या घटनेला दोन दिवस उलटल्यावरही प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तणाव कायम आहे. या भागात तैनात असणाऱ्या जवानांमध्ये चीनच्या दगाबाजीने संतापाचे वातावरण आहे. दरम्यान, दोन्ही देशातील मेजर जनरल पातळीवरील चर्चा गुरुवारीही सुरू होती.
सीमेवर सध्या गस्तीनाका 14 वर सर्वाधिक तणावाचे वातावरण आहे. येथेच सोमवारी रात्री धुमश्चक्री उडाली होती. मेजर जनरल पातळीवरील चर्चा सुरू असल्या तरी जवानांमध्ये बदल्याची भावना खदखदत आहे. लष्करी अधिकारी स्थिती नियंत्रणात असल्याचे सांगत आहेत. मात्र, जवानांना संयम ठेवण्यास सांगताना अधिकाऱ्यांना कसरत करावी लागत आहे.
चीन आणि भारतीय सैन्यात धुमश्चक्रीत 20 जवान मारले गेले. त्यापैकी काही जवानांच्या मृतदेह पाहून जवानांमध्ये संतापाचे वातावरण आहे. ते मृतदेह पाहून चिनी सैनिकांच्या क्रौर्याची कल्पना येत आहे.
लेहमधील कोपस् कमांडर तीनही डिव्हिजनल कमांडरच्या संपर्कात आहेत. त्यांच्याकडून दर तासाला माहिती घेण्यात येत आहे. त्यात पर्यायांची चर्चा करण्यात येत आहे. चीनने आणखी चर्चा होण्याची गरज व्यक्त केली असली तरी अद्याप त्याच्या अधिकाऱ्यांच्या पातळीविषयी भाष्य केले नाही.
या भागात तैनात असणाऱ्या तीनही लष्करी तळांवरील जवानांमध्ये संतापाचे आणि रागाचे वातावरण नियंत्रणात ठेवण्याचे काम लष्कराला करावे लागत आहे. गेल्या 40 दिवसांत तीनदा या भागात चीनशी स्फोटक स्थिती निर्माण झाली होतो. मे 5 6, 13 मे आणि मे 29 लाही अशीच स्थिती पॅनगॉंग टीसो येथेही तयार झाली होती.