चिंबळी,(वार्ताहर) – जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून दुपारी उकाडा जाणवू लागला आहे. किमान तापमानातही काहीअंशी वाढ झाली आहे. विषम वातावरणाचा रब्बी, वेलवर्गीय व फळ पिकांनाही फटका बसत आहे. यंदा हुडहुडी भरविणारी थंडी मागील काही दिवसच होती मात्र; रब्बी पिकांसाठी पोषक असे वातावरण यंदा न मिळल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची भीती बळीराजा व्यक्त करीत आहे.
एक फेब्रुवारीनंतर ढगाळ वातावरणाची समस्या वाढली आहे. जिल्ह्यात किमान तापमान 32 अंश सेल्सिअसवर पोहचले आहे. परंतु ढगाळ वातावरणाने किमान तापमानात वाढ झाली आहे. यंदा नोव्हेंबरमध्ये तीन दिवसच पारा 10 अंश सेल्सिअसपर्यंत होते. डिसेंबरमध्येही काही दिवस ढगाळ व पावसाळी वातावरण होते. यामुळे रब्बी पिकांच्या वाढीला फटका बसला आहे.
ज्वारी, हरभरा, मका आदी पिकांसाठी थंडी आवश्यक आहे. विषम वातावरणामुळे वेलवर्गीय पिकांसह मक्यासह अन्य पिकात फवारणी घेऊन बुरशीजन्य व अन्य कीटकांची समस्या दूर करावी लागत आहेत. यात खर्च व अतिरिक्त श्रम लागत आहेत. तसेच उत्पादनावरही परिणाम होत आहे. विषम वातावरणामुळे काही पिकात पिकात करपा रोगाची समस्या आली होती. तर मध्येच ढगाळ वातावरण तयार झाल्याने बुरशीजन्य रोगही फोफावू लागले आहेत. यामुळे खते, पाण्यासंबंधीचे काटेकोर नियोजन शेतकर्यांना करावे लागत आहे. मध्येच ढगाळ वातावरण तयार होत असल्याने बळीराजा धास्तावला आहे.
हिवाळा जाणवलाच नाही
यंदा हिवाळा अधिक दिवस जाणवलाच नाही. हुडहुडी भरविणारी थंडी पडलीच नाही, असे शेतकर्यांचे म्हणणे आहे. थंडी अधिक राहिल्यास ज्वारी, मका आदी पिकांचे सिंचन अधिकचे करावे लागत नाही. किमान एक पाण्याची पाळी वाचते; परंतु यंदा थंडी नसल्याने पीकवाढीवर जसा परिणाम झाला. तशी पाण्याची गरजही वाढली असल्याचे बळीराजाचे म्हणणे आहे.