माधव विद्वांस
सागरीयुद्ध निपुण चिमाजी अप्पा पेशवे यांचे आज पुण्यस्मरण. चिमाजी अप्पा हे सातारच्या छ. शाहूमहाराज यांचे पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ यांचे द्वितीय चिरंजीव. लक्ष्मणाप्रमाणे आपल्या भावाशी सदैव पाठीशी असणारे म्हणून त्यांची ख्याती आहे. आपल्या बंधूंबरोबर राहून त्यांनी राजकारण आणि युद्धनीती आत्मसात केली होती. चिमाजी अप्पा प्रसिद्धीस आले ते पोर्तुगिजांबरोबर झालेल्या वसईच्या लढाईमुळे. बाजीराव पेशवे निजाम आणि उत्तरेच्या राजकारणात गुंतले असल्याने वसईची मोहीम त्यांनी चिमाजी अप्पा यांच्यावर सोपविली होती.
बांद्य्रापासून उत्तरेस डहाणूजवळील सेगवागडपर्यंत किनारपट्टी व आतील भागावर पोर्तुगीजांची अनिर्बंध सत्ता होती. ही सत्ता चिमाजी अप्पांनी 30 महिने कोकणात राहून संपविली. वसई व आसपासचा भाग पोर्तुगीजांनी कल्पकतेने किल्ले बांधून संरक्षित केला होता. या भागात त्यांनी अनेक टेहळणी बुरुज व भक्कम किल्ले बांधले होते.
चिमाजी अप्पांनी पालघरच्या उत्तरेकडून वज्रेश्वरी बाजूने तसेच कल्याणकडून वसईखाडीतून पोर्तुगीजांच्या चौक्या व किल्ले हस्तगत करण्यास सुरुवात केली.शेवटच्या टप्प्यात भाईंदरच्या बाजूने हल्ला चढविण्याची योजना आखली. वसई किल्ला जिंकण्यासाठी मराठ्यांनी भाईंदरजवळ धारावी किल्ला बांधणे आवश्यक आहे याची जाणीव होताच 12 एप्रिल 1737 मध्ये मराठ्यांनी धारावीवर हल्ला केला आणि धारावी ताब्यात घेऊन किल्ला बांधायला घेतला. या किल्ल्याच्या कामावर 2,200 मजूर होते व त्यांना पाच रुपये रोज देण्यात येत होता. अशी पेशवे दप्तरात नोंद सापडते. किल्ल्याचे बांधकाम निम्मे झाल्यावर धोक्याची जाणीव होताच पोर्तुगीजांनी हल्ला करून धारावीची जागा ताब्यात घेतली व किल्ल्याचे बांधकाम पूर्ण केले. मराठ्यांनीही परत हल्ला केला पण तो अयशस्वी झाला.
अखेर 6 मार्च 1739 रोजी किल्ला परत ताब्यात आला व वसईवर अखेरचा निकराचा हल्ला चढविला व 22 मार्च 1739 रोजी वसई मोहीम यशस्वी झाली. त्यानंतर मराठा सैन्यांने किल्यातील चर्चमधील मोठ्या घंटा उतरवून त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढली. त्या घंटा भीमाशंकर, बल्लाळेश्वर मंदिर तसेच एक घंटा वाई जवळील मेणवली येथील नाना फडणीसांच्या वाड्यामागे त्यांनी बांधलेल्या घाटावर आहे. मेणवली जवळील घंटेवर पोर्तुगीज भाषेतील लेख दिसून येतो.चिमाजी अप्पांनी मोहीम यशस्वी झाल्यावर वज्रेश्वरी देवीचे मंदिर उभारले. चिमाजी अप्पांचा जन्म कोठे झाला तसेच जन्म तारीख याची निश्चित अशी नोंद मिळत नाही. चिमाजी अप्पा यांचे 17 डिसेंबर 1740 रोजी पुणे येथे
निधन झाले.