उजनी परिसरात तुरळक होणाऱ्या मासेमारीवर परिणाम
राजेगाव – भीमा नदीच्या गोड्या पाण्यात झपाट्याने वाढणारा व सुप्रसिद्ध असणारा चिलापीला (डुक्करमासा) तब्बल दोनशे रुपये प्रतिकिलो भाव मिळत आहे. यामुळे मच्छिमारांमध्ये आनंदाचे वातावरण असले तरी खवय्यांकडून वाढत्या भावामुळे नाराजी व्यक्त होत आहे.
उजनीच्या परिसरात तुरळक प्रमाणात होणाऱ्या मासेमारीसाठी देखील अनेक अडचणी येत आहेत. दुर्गंधीयुक्त हिरवट पाण्यात मत्स्य व्यावसायिकांच्या शरीरावर विपरीत परिणाम होत आहेत. एरवी हाच डुक्करमासा चाळीस ते पन्नास रुपये प्रतीकिलो मुबलक प्रमाणात मिळायचा. सध्या भीमा नदीच्या प्रदूषणात झपाट्याने होत असलेली वाढ, मत्स्यबीजांची होत असलेली कत्तल आणि त्यातच हिरवट रंगाच्या दूषित थरामुळे जैववैविध्यावर घाला घातला जात असल्याने भीमा नदीत होणाऱ्या मासेमारीवर मोठा परिणाम झाला आहे.
एके काळी याच भीमा नदीच्या पात्रात अनेक जातींच्या माशांची मोठी प्रजाती सहजपणे आढळून येत होती. मात्र, आताच्या स्थितीला ठराविकच म्हणजे फक्त चिलापी (डुक्करमासा) जातीचा मासाच पाहावयास मिळत आहे. संपूर्ण उजनी धरणासह फुगवट्यावर असणाऱ्या हजारो मासेमारी व्यावसायिकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.
उजनीच्या फुगवट्यावर भीमा नदीपात्रालगत परप्रांतीयांकडून मत्स्यबीज लहान जाळींच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात मारले जात आहे, त्यामुळे विविध जातींच्या माशांच्या प्रजातीही नष्ट होत आहेत, त्यामुळे परप्रांतीयांवर कारवाई होणे गरजेचे आहे.
राहुल नगरे, अध्यक्ष, दौंड तालुका मच्छिमार कृती समिती