मुंबई – राज्यात काही दिवसांपासून पुन्हा करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर यवतमाळपाठोपाठ अमरावतीतही लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने अमरावती जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रविवारपासून जिल्हा बंद ठेवण्यात येणार असून, केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहतील, अशी माहिती अमरावतीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली. आता राज्यातील लॉकडाऊन संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत.
कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यानं स्थानिक प्रशासनाला निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत, असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले. अकोला, यवतमाळ आणि अमरावतीमध्ये कोरोना संसर्ग वाढल्यानं मुख्यमंत्र्यांनी स्थानिक प्रशासनाला उपाययोजना करण्याचे अधिकार दिले आहेत.
दरम्यान लॉकडाऊन करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती अनिल परब यांनी दिली. राज्यात कोरोना रुग्ण वाढत असून कडक नियम लागू करण्याची गरज आहे, असंही अनिल परब म्हणाले. महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं अधिवशेन टप्प्या टप्प्यानं वाढवण्यात येईल. २५ फेब्रुवारीला याबाबत बैठक घेण्यात येईल आणि त्याबाबत निर्णय होईल, अशी माहिती देखील अनिल परब यांनी यावेळी दिली.