मुंबई – करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेऊन राज्यातील नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात यावेत, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले. तसेच जागतिक परिस्थिती पाहता करोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे दिवाळीनंतरचे काही दिवस अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारे आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड, राज्यामंत्री बच्चू कडू, अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा आदि उपस्थित होते.
उद्धव ठाकरे म्हणाले, राज्यातील ज्या शाळांमध्ये क्वारंटाइन सेंटर्स उभारण्यात आले आहेत, ते सद्यपरिस्थितीत बंद करता येणार नाहीत. अशा ठिकाणच्या शाळा पर्यायी जागेत सुरू करता येतील का त्याबाबत स्थानिक प्रशासनाने निर्णय घ्यावा.
शाळांचे सॅनिटायझेशन, शिक्षकांची करोना चाचणी या सारख्या सर्व बाबींची काळजी घेणे आवश्यक आहे. जी मुले आजारी आहेत किंवा ज्या घरातील व्यक्ती आजारी आहे अशा पाल्यांना पालकांनी शाळेत पाठवू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
दरम्यान, शाळा सुरू करताना टप्प्या टप्प्याने शाळा सुरू कराव्या. तसेच शाळा व्यवस्थित सुरू राहाव्यात यासाठी स्थानिक प्रशासनाला योग्य त्या सूचना देण्याची विनंती राज्यमंत्री बच्चू कडू यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना केली. शाळा सुरू करण्यासंदर्भातील सविस्तर एसओपी तयार करण्यात आली असून स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने टप्प्या टप्प्यांने शाळा सुरू करण्यात येतील, असे अप्पर मुख्य सचिव कृष्णा यांनी सांगितले.
चार तासांची शाळा – वर्षा गायकवाड
शाळा सुरू होण्यापूर्वी सर्व शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणी ही 17 ते 22 नोव्हेंबर या दरम्यान स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून करून घेतली जाईल, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी यावेळी दिली. तसेच शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे थर्मल चेकींग करण्यात येईल. एका बेंचवर एका विद्यार्थी बसविण्यात येईल. तसेच एक दिवसाआड वर्ग भरतील, विद्यार्थ्यांनी घरून जेवण करून यावे, स्वत:ची पाण्याची बाटली सोबत आणावी.
याशिवास शाळा चार तासांची राहणार असून त्यात केवळ विज्ञान, गणित आणि इंग्रजी असे कठीण विषय शिकवले जातील. या विषयांसह बाकी विषयांसाठी ऑनलाइन वर्गांची सुविधा असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.